बांबवडे इथं गायरान फुकट देणे आहे ?
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं गायरान फुकट देणे आहे. ज्याला कुणाला जागा हवी असेल, त्यांनी स्मशानभूमी समोर शिल्लक असलेल्या गायरानाच्या जागेत अतिक्रमण केले , तरी चालेल. ग्रामपंचायत याबाबत काहीही बोलणार नाही. कारण त्याबाबत तक्रार केल्याशिवाय कुणीही तुम्हाला विचारणार नाही. अशीच एकंदरीत परिस्थिती बांबवडे इथं सुरु आहे. याबाबत कुणीही काहीही बोलत नाही. हि परिस्थिती जर भविष्यात बदलली नाही, तर मात्र उग्र आंदोलन करण्यात येईल, अशी छुपी चर्चा ऐकावयास मिळत आहे.

बांबवडे तालुका शाहुवाडी इथं केवळ ३ एकर गायरान शिल्लक आहे. आणि त्याचं गायरानात अनेक प्रस्थापितांसहित बाहेरून आलेली मंडळी खुलेआम अतिक्रमण करीत आहेत. इथं कुणाची पानपट्टी,तर कुणाचे सर्विसिंग सेंटर, तर कुणाचा वाळूचा डेपो. अशी अनेक मंडळी इथं येण्याच्या तयारीत आहेत. परंतु याबाबत ग्रामपंचायत संचालक मंडळ डोळ्यांवर झापडं ओढून आहेत. याचे कारण सुद्धा तसेच आहे. स्मशान भूमिशेजारी असलेल्या रहिवाशी संकुलाला मुख्य मार्गावर येण्यासाठी ग्रामपंचायत ने बिनबोभाट गप्प राहून रस्ता करून दिला आहे. त्यामुळे इथं गप्प बसण्याशिवाय त्यांना काही पर्याय नाही. आणि या रस्त्यामुळेच कधी नव्हे तो, पावसाळ्यात गावाचा पाझर तलाव उलटून वाहून गेला होता. भविष्यात हा रस्ता असंच राहिला तर गावाच्या पाझर तलावाला धोका पोहचल्याशिवाय राहणार नाही.

एकेकाळी आजी-माजी सरपंचांनी गावचे गायरान वाचवण्यासाठी आमरण उपोषण केले होते. आज मात्र तीच मंडळी मुग गिळून गप्प कशी ? हा सर्वमान्य प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.

यावर तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी त्वरित लक्ष घालून कारवाई करावी, अन्यथा उग्र आंदोलन छेडले जाईल. याची जाणीव असावी.