तरुणाईच्या गळ्यातील ताईत हरपला
बांबवडे : अशोकराव घोडे-पाटील म्हणजे सर्व-सामान्य जनतेला मिळालेला एक आधार. आज त्यांच्या या अचानक एक्झिट ने बांबवडे पंचक्रोशीवर एक आघात झाला आहे. याहीपुढे जावून म्हटलं तर, तरुणाईच्या गळ्यातील ताईत आज हरपला आहे. त्यांच्या जाण्याने तरुणाई पोरकी झालीयं. म्हणूनच त्यांच्या आयुष्यावर टाकलेला एक प्रकाशझोत.
अशोकभाऊ म्हटलं कि, तरुणाई ला बळ यायचं. कारण अशोकभाऊ एक व्यक्तिमत्वंच असं होतं कि, काहीही झालं तरी आपली माणसं सोडायची नाहीत, त्यांच्यासाठी काहीही करायची त्यांची तयारी असायची. एक भोळ्या स्वभावाचा माणूस आपल्याकडे आलेल्या माणसांवरून जीव ओवाळून टाकायचा. म्हणूनच त्यांच्या भोवती तरुणाई नाही म्हटलं तरी घुटमळायची. अशोकभाऊंच्या घराण्यांन गावच्या सरपंच पदापासून राजकारणाला सुरुवात केली. त्यानंतर अशोकभाऊ ग्रामपंचायतला उतरले, व लगेच पंचायत समिती सुद्धा त्यांनी गाजवली. एकेकाळी राजकारण करताना समाजकारण ते विसरले नाही. गावातील अनेक वाद भाऊंनी सहज मिटवले, कारण त्यांचा दरारा हि तसाच होता.
कालपरत्वे भाऊ जनसुराज्य पक्षाचे खंदे समर्थक झाले. माजी आमदार विनय कोरे यांच्या माध्यमातून जनतेची कामे करण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. परंतु नंतर आजरी पडल्याने, राजकारणाकडचे लक्ष थोडे कमी केले. परंतु त्या आजारावरही त्यांनी यशस्वी मात केली होती.
परंतु आज त्यांची अचानक झालेली एक्झिट मनाला चुटपूट लावत आहे. कारण अशोकभाऊ राजकीय दृष्ट्या कोणत्याही गटाचे काम करीत असले तरी, त्यांना आपल्या गावच्या लोकांची मात्र निश्चितच काळजी असायची. गावातील प्रत्येक विकासकामात सोबत असलेली हि व्यक्ती, आज आपल्यात नसल्याने बांबवडे गावचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या पश्चात आई, भाऊ,पत्नी मुले ,पुतणे असा मोठा परिवार आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो,त्यांचा कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.