६ जुलै पर्यंत शिक्षक भरती न झाल्यास सी. ओ. ना घेराव घालणार :शाहूवाडी स्वाभिमानी संघटना
शाहूवाडी : शाहूवाडी तालुक्यातील अनेक जिल्हापरिषद शाळांमध्ये शिक्षक भरती झालेली नाही, याहीपुढे जावून तालुक्यातील आठ शाळा शिक्षकांशिवायचं सुरु आहेत. येत्या ६ जुलै च्या आत हि शिक्षक भरती न झाल्यास, जिल्हापरिषद च्या मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटना, शाहूवाडी यांच्यावतीने शाहूवाडी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सौ.प्रतिभा सुर्वे मॅडम यांना देण्यात आले.
शाहुवाडी तालुका दुर्गम आहे. इथं नोकरी करणे म्हणजे शिक्षा समजली जाते. अशा ठिकाणी शिक्षक मंडळी नोकरी करण्यास नाक मुरडतात. आणि वशिले लावून इथली बदली, दुसरीकडे करून घेतात. परंतु या परिस्थितीचे ज्ञान पंचायत समितीतील सदस्य मंडळींना असूनही इथली शिक्षक मंडळी का सोडलीत , यामुळे इथल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार , याचे भान सदस्य मंडळीना असू नये, हे दुर्दैव आहे.
दरम्यान शिक्षक भरती येत्या ६ जुलै च्या आत न झाल्यास मुख्याधिकाऱ्यांना कोल्हापूर जिल्हा परिषद इथे घेराव घालणार, असेही संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर संघटनेचे वसंत पाटील, जयसिंग पाटील, प्रशांत पाटील, सुरेश म्हाऊटकर, गुरुनाथ शिंदे, अजित साळोखे, अमर पाटील, पंकज पाटील, दर्शन कोले,सागर शंभू शेटे यांची नावे नमूद आहेत.
तालुक्यातील प्रत्येक शाळेला गुरुजी मिळाले पाहिजेत, यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा केली होती, शिक्षणमंत्र्यांनी शब्द हि दिला होता. परंतु याबाबत अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने , संघटनेला उग्र आंदोलन करावे लागणार आहे. असेही संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.