प्रार्थनास्थळे व मंदिरे यांनी भान राखावे : सध्या मानवता हाच धर्म
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे इथं आजपासून कडक निर्बंध निदर्शनास येत आहेत. खाजगी सुरक्षा रक्षक व पोलीस काम करताना दिसून येत आहेत. यामुळे काही प्रमाणात लोकांच्या वर्दळी वर परिणाम झाला आहे. परंतु प्रार्थनास्थळांना पहाटे भेटी देणे गरजेचे आहे. असे निदर्शनास येत आहे.
येथील प्रार्थनास्थळे मात्र आजदेखील गर्दी करताना दिसत आहेत. येथील मंदिरे असो, वा इतर प्रार्थनास्थळे यांनी देखील भाविकांना कडक निर्बंधांचे बंधन घालून देणे , हि काळाची गरज आहे. कारण आज जे प्रशासनाने निर्बंध घातले आहेत, ते आपल्यासारख्या सामान्य जनतेसाठीच आहेत. आज आपण पहात आहोत, कि, अनेक ठिकाणी अनेक कुटुंबातील कर्तीसवरती मुले या कोरोना च्या महामारीत डोळ्या आड झाली आहेत. आज हे दुसऱ्या कोणाच्या कुटुंबात सुरु आहे, उद्या ते आपल्या कुटुंबात होणार नाही, कशावरून, याचे भान आपण सर्वांनी ठेवणे गरजेचे आहे.
भाविकांनी आपली भक्ती निश्चितच करावी, परंतु प्रत्येक धर्मात समाज धर्म मोठा आहे, असे सांगितले आहे. काही दिवस आपण हि निर्बंध पाळलीत, तर अनेकांचे प्राण आपण वाचवू शकतो. यासाठी प्रत्येकानेच आपला धर्म काहीकाळ बाजूला ठेवून समाज हाच आपला धर्म मानावा, जेणेकरून मानवतेचा ,अहिंसेचा धर्म पाळला जाईल.
प्रशासन ह्या महामारीला रोखण्यासाठी चोवीस तास प्रयत्न करीत आहेत. आज तालुक्यात कोविड केंद्रे सुरु आहेत. त्यावर नियंत्रण ठेवले जात आहेत. आज अनेक प्रशासकीय अधिकारी घर-दार विसरून या महामारीचा सामना करीत आहेत. त्यांच्या या कष्टाला आपण सहकार्य करणे,हे आपले प्रथम कर्तव्य आहे. असो.
सर्वानीच प्रशासनाच्या या निर्बंधांचे पालन करून कोरोना सारख्या महामारीला हद्दपार करू या.