बांबवडे इथं दुकानात पाणी शिरल्याने तरुण उद्योजकांचे लाखो रुपयांचे नुकसान
बांबवडे : शाहुवाडी तालुक्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या बांबवडे येथील व्यापाऱ्यांचे पुराच्या पाण्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, येथील भागाचे त्वरित पंचनामे व्हावेत,अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.
गेल्या दोन दिवसात झालेल्या तुफान पावसाच्या फटकेबाजीमुळे कधी नव्हे, तो बांबवडे तलाव उलटून गेला. त्याचबरोबर कधी नव्हे ते, अंबीरा ओढ्याचे पाणी पुलावरून वाहू लागले. यामुळे येथील तरुण उद्योजक असलेल्या विठ्ठल पोवार यांच्या माऊली फुटवेअर या दुकानात पाणी शिरले. यामुळे त्यांचे सुमारे पंधरा लाखांच्यावर नुकसान झाले आहे. तसेच येथील महालक्ष्मी भांडी दुकान असलेल्या तरुण उद्योजक बाबा खुटाळे यांचे सुमारे दहा लाखांच्यावर नुकसान झाले आहे, तर भोला फोटो स्टुडीओ यांचे सुमारे दोन लाखांच्यावर, तसेच कृषी सेवा केंद्रे, दवाखाना, हॉटेल्स, इलेक्ट्रिक दुकान, किराणा दुकान, बझार अशा अनेक व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे.अशा अनेक व्यापाऱ्यांचे मिळून सुमारे एक कोटीच्यावर व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे.
यामुळे या व्यावसायिकांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्यात यावेत, कारण त्यांना पुन्हा दुकाने उघडणे, गरजेचे आहे.
पावसामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होण्याची हि पहिल्यांदाच वेळ आली आहे. सध्या ज्या व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यात तरुण उद्योजकांचे प्रमाण अधिक आहे. अशा मंडळींना उभारी येण्यासाठी शासनाने त्वरित उपाययोजना करावी,अशी मागणी देखील व्यापारी वर्गातून होत आहे.