वन क्षेत्रपालांच्या विरोधात राजू शेट्टी यांची तत्काळ दखल : शेतकऱ्यांचा ” जीवाभावा चा नेता ” जनतेतून चर्चा
शित्तूर वारुण विशेष ( दशरथ खुटाळे ) : शाहुवाडी तालुक्याच्या उत्तर भागात असलेल्या उखळू गावच्या ग्रामसभेस माजी खासदार राजू शेट्टी यांनी विशेष उपस्थिती दर्शवून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली. एकंदरीत खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी माजी खासदार राजू शेट्टी हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असल्याचे सिद्ध झाले आहे. दरम्यान विद्यमान खासदार मात्र शेतकऱ्यांच्या यादीतून बाहेर गेले का ? असा प्रश्न ग्रामस्थांतून चर्चेला येत आहे.
उखळू तालुका शाहुवाडी येथील शेतकऱ्यांना वन विभागाकडून त्रास होत होता. यासंदर्भात अधिकारी वर्ग लक्ष देत नव्हता. तेंव्हा माजी खासदार राजू शेट्टी यांना निमंत्रित केले गेले. त्यांच्या उपस्थितीत आज ग्रामसभा संपन्न झाली. यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांची मात्र तारांबळ उडाली.
दरम्यान येथील वन क्षेत्रपाल नंदकुमार नलवडे, हे ग्रामस्थांशी अरेरावी च्या भाषेत बोलत असतात. याची तक्रार उखळू ग्रामस्थांनी मा. खासदार राजू शेट्टी यांच्याकडे केली. तेंव्हा राजू शेट्टी यांनी अधिकाऱ्यांना विचारणा केली. शामाप्रसाद मुखर्जी योजना येथील शेतकऱ्यांना का राबविली जात नाही. हि योजना न राबविल्यामुळे येथील शेतकरी या योजनेच्या लाभापासून आजवर वंचित होते. तसेच वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानी बाबत नलवडे यांना सांगितले असता, त्यांनी अरेरावी ची भाषा केली. म्हणून राजू शेट्टी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर ,याबाबत शेट्टी स्वत: ग्रामसभेस उपस्थित राहिल्याने अधिकारी वर्ग ग्रामसभेस उपस्थित राहिले.
घडलेल्या घटनेबाबत त्यांनी ग्रामस्थांकडे दिलगिरी व्यक्त केली. इथून पुढे असे होणार नाही, याची ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून सर्व प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही खास. राजू शेट्टी यांच्या साक्षीने ग्रामस्थांना दिली.
यावेळी मणदूर सरपंच वसंत पाटील, राजू वडाम पाटील, शिवाजी वडाम व उखळू,मणदूर चे ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येवर उपस्थित होते.