गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आघाडीचा गुलाल लागणार- श्री अभयसिंह चौगुले
बांबवडे : बांबवडे ग्रामपंचायत निवडणूक एकदिलाने लढविली जातेय, यालाही काही कारणे आहेत. ज्यांनी गाव चालवायचं,तीच मंडळी हेकेखोरपणे वागू लागलीत. त्यांच्या शहाणपणा समोर बाकी सगळे नगण्य होवू लागले. अशावेळी गावाच्या सन्मानाच्या हितार्थ सगळ्यांना एक होणे, भाग पडले. बांबवडे सारख्या गावात अंगणवाडी च्या खोल्या भाड्याने घ्याव्या लागतात, यासारखी दुसरी नामुष्की नाही. यासाठी हि निवडणूक सगळे गट एकत्र येवून लढत आहेत, आणि जिंकणार सुद्धा, असे मत श्री महादेव ग्रामविकास आघाडीचे आयोजक श्री अभयसिंह चौगुले यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले कि, गावाकडे उत्पन्नाचे स्त्रोत असूनसुद्धा देशाचं भवितव्य भाड्याच्या खोलीत आपल्या आयुष्याचा श्रीगणेशा करीत असेल, तर यासारखे दुसरे वाईट काही नाही. केवळ ठेकेदारीसाठी विकासकामे हे सूत्र बदलण्याची गरज आहे. गावातील व्यापारपेठेत मंजूर झालेले वीज वितरण कंपनीचे ट्रान्स्फार्मर कोण एकाच्या हेकेखोरपणामुळे परत जात असेल, तर यासारखे दुसरे वैषम्य नाही. यामुळे व्यापारपेठेत सुरु असलेले संगणक नुसते गोल गोल फिरतात. कारण पुरेशी वीज त्यांना मिळत नाही, हि वस्तुस्थिती आहे. हे कोणीच नाकारू शकत नाही.

मागील पंचवार्षिक निवडणुकीत सांगितलेले वायफाय अजूनही गावात येतेच आहे. सीसी टीव्ही कॅमेरे बसविले गेले ते देखील फक्त चारच. बांबवडे चौपाटी मागील निवडणुकीतील मुद्दा आजही आहे तिथेच आहे. गावात स्वच्छतागृहे निर्माण करण्याचा आमचा मानस आहे. कारण प्रभाग क्र.४ मध्ये राहणाऱ्या गोर गरीब जनतेला त्याची आवश्यकता आहे. आम्ही फक्त एका प्रभागाकडे लक्ष न देता अवघ्या गावाच्या विकासाकडे लक्ष देत आहोत.

गेली पंधरा वर्षे क्रीडासंकुल चा मुद्दा रेंगाळत आहे. स्व. आमदार संजय दादांनी ते मंजूर केले होते. त्यांच्या अवकाळी निधनाने तो मुद्दा तसाच राहिला. तुम्ही त्याकाळात जर तो पूर्ण केला असता,तर पोलीस भरती साठी, आर्मी भरतीसाठी रस्त्याने पळणारे तरुण क्रीडासंकुलात दिसले असते. इथं आपण काही करायचे नाही आणि दुसऱ्याला काही करू द्यायचे नाही. अशी अवस्था बांबवडे नगरीत करून ठेवली आहे. याचसाठी गावाच्या कारभारात बदल गरजेचा आहे.

श्री शंभू महादेवाच्या साक्षीने ग्रामस्थांनी हा बदल घडविण्याचे ठरविले आहे. म्हणूनच श्री महादेव ग्रामविकास आघाडी आपल्या शब्दाला ठाम राहून, गावात विकासकामे आणणार आहे, यात शंका नाही. यासाठी बांबवडे ग्रामस्थांना हे आवाहन आहे कि,श्री महादेव ग्रामविकास आघाडीला आपल्या मतांच्या आशीर्वादाने निवडून द्यावे, असेही श्री अभयसिंह चौगुले यांनी सांगितले