…तर ती प्रतारणा होईल – स्वाभिमानी चे श्री राजू शेट्टी
बांबवडे : मी शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढलो,तर मी शिवसेनेत प्रवेश केल्यासारखे झाले असते. आणि ती शेतकऱ्यांशी आणि स्वाभिमानी संघटनेशी प्रतारणा केल्यासारखे होईल. म्हणून मी मशाल चिन्हावर लढण्यास नकार दिला. अस मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा माजी खासदार आणि संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दरम्यान हातकणंगले लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडी राजू शेट्टी यांना पाठींबा देणार, असे संकेत असताना शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी मशाल चिन्हावर लढण्याची अट घातल्याने हि बोलणी फिसकटली. कारण राजू शेट्टी यांनी कोणत्याही पक्षात न जाता स्वतंत्र उभे राहून शेतकरी, सर्व सामान्य माणूस, कष्टकरी यांची बाजू मांडण्यासाठी स्वत:चा स्वाभिमानी पक्ष निर्माण केला आहे. असे असताना मी मशाल चिन्हावर निवडणूक लढवणे म्हणजे सामान्य जनतेशी केलेली प्रतारण होईल. तेही केवळ निवडून येण्यासाठी हा समजोता करणे माझ्यासारख्या स्वाभिमानी माणसाला जमणार नाही. म्हणूनच मशाल चिन्हावर निवडणूक न लढता स्वतंत्र निवडणूक लढणार असून, सर्वसामान्य जनता माझ्या भावना समजून घेवून मला निश्चित निवडून आणतील, याची खात्री देतो. असेही श्री राजू शेट्टी यांनी सांगितले.