अखेर ” बांबवडे ” त कोरोना प्रवेशकर्ता जाहला : दोन पॉझीटीव्ह
बांबवडे : बांबवडे ता.शाहुवाडी इथं कोरोना चे दोन इसम पॉझीटीव्ह आल्याने, बांबवडे आज दुपारपासून पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार बांबवडे बंद करण्यात आले आहे.
बांबवडे हि मोठी बाजारपेठ असल्याने, बंद चा निर्णय घेण्यात आला. काहीदिवासंपुर्वी च बांबवडे सुरु करण्यात आले होते. बांबवडे गावाच्या भोवतीने सुमारे पन्नास ते साठ गावे आहेत. या गावांना बांबवडे, हि एकमेव जवळची बाजारपेठ आहे. आजूबाजूंच्या गावात कुणीही संक्रमित रुग्ण आढळल्यास, सर्वप्रथम बांबवडे बंद केले जात होते. यामुळे येथील व्यापारपेठेला मोठा आर्थिक फटका बसला आहे. अशी खंत लहान व्यापारी वर्गाकडून व्यक्त होत आहे.
मुळात कोरोना मुळे समाज अगोदरच त्रस्त आहे, त्यात येथील तरुण नोकरी धंद्याच्या अनुषंगाने पुणे- मुंबई सारख्या शहरात वास्तव्य करून आहेत. कोरोना काळामध्ये या तरुणाच्या नोकऱ्या गेल्या, तर काहींना ब्रेक दिले गेले. काही जण तर भाजीपाला विकू लागले. एकीकडे कोरोना चा आरोग्यदृष्टीने पडलेला विळखा, तर दुसरीकडे आर्थिक आणीबाणी , अशा दोलायमान अवस्थेत येथील कुटुंबे दिवस कंठीत आहेत. एरव्ही एखादा इसम कोरोना पॉझीटीव्ह आल्यास अख्खी बाजारपेठ बंद करणे, हा त्यावर उपाय होवू शकतो का ? हा प्रश्न विचाराधीन आहे. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गब्बर व्यापारी, आपला झालेला तोटा भरून काढतो. पण इतर सामान्य व्यापाऱ्यांचे काय? या प्रश्नाचा सुद्धा शासनाने विचार करणे, गरजेचे आहे. गेल्या सहा महिन्यात केवळ दोनच महिने, हि व्यापारपेठ कशीबशी सुरु राहिली. पण इतरवेळा मात्र सर्व व्यापारपेठ पूर्णतः बंद होती. तेंव्हा पुढील आदेश शासनाकडून येईपर्यंत बंद ठेवणे, यावर शासनाला येथील स्थानिक कोरोना समिती ने पटवून सांगणे, गरजेचे आहे. अन्यथा आजपर्यंत समितीला मिळणारे यश हे सामान्य व्यापारपेठेचा संयम आहे, याची नोंद समितीने घ्यावी, आणि लवकरात लवकर प्रतिबंधित क्षेत्र उठवावे. एका कोरोन रुग्णासाठी गाव वेठीस धरणे, हे योग्य नव्हे. जो रुग्ण संक्रमित आला आहे, त्यांच्या संपर्कातील मंडळींना क्वारांटाईन करणे, गरजेचे आहे, ते करावे, असे असताना गाव प्रतिबंधित करणे, हे शासन आदेशासाठी राहील.