..आणि विशाळगड ने पुन्हा एकदा अनुभवली शिवरायांची स्वराज्य प्रेरणा
आंबा : शाहुवाडी तालुक्यातील विशाळगड च्या कोसळलेल्या बुरुजाचे दगड सुमारे सहा ते आठ तासांच्या परिश्रमानंतर सुरक्षित स्थळी बसविण्याची मोहीम सह्याद्री प्रतिष्ठान च्या सुमारे चारशे कार्यकत्यांनी फत्ते केली आहे. असे मत मोहिमेचे नेतृत्व करणारे प्रमुख श्रमिक गोजम गुंडे, प्रशांत कुंभार यांनी व्यक्त केले आहे.

विशाळगड च्या कोसळलेल्या बुरुजाचे दगड ” हर हर महादेव ” च्या घोषणांच्या गजरात विशाळगड च्या पायथ्यापासून गडावर रणमंडळ टेकडी वर नेण्यात आले. सह्याद्री प्रतिष्ठान च्या गड संवर्धन मोहिमेंतर्गत दि. १५ जुलै ला पुरातत्व विभागाच्या परवानगीने रविवार दि.१७ जुलै रोजी विशाळगड च्या पायथ्याशी जमायचे ठरले. यासाठी मुंबई, पुणे, हवेली, पिंपरी, चिंचवड, बार्शी, खेडचाकण, सोलापूर, नाशिक, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग येथून सुमारे चारशे कार्यकर्ते विशाळगड च्या पायथ्याशी जमा झाले. विशेष म्हणजे यामध्ये पंचवीस युवतींनी सुद्धा आपला सहभाग नोंदवला, हे वैशिष्ठ्यपूर्ण आहे.

कार्यकर्त्यांनी पहिल्या टप्प्यात दोन्ही बाजूला रांगा लावून, दीडशे फुटावरील लोखंडी शिडी पर्यंत दगड आणले. तेथून ते दुसऱ्या टप्प्यात शिडीवरून तीन चार तरुणांच्या मदतीने एक एक करीत सगळे दगड रणमंडळ टेकडी वरनेवून ढीग लावून ठेवले.

दरम्यान दुर्दैवाने स्थानिक प्रशासन मात्र कोणीही फिरकले नाही. असेही मोहिमेतील कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. भर पावसात शिवप्रेमींनी राबविलेली मोहीम पाहून, विशाळगड सुद्धा सुखावला असेल, आणि या शिवप्रेमींवर कौतुकाचा वर्षाव वरुणराजाच्या रूपाने त्यांच्यावर बरसत होता. दरम्यान या मोहिमेने विशाळगड ने पुन्हा एकदा छत्रपातीं शिवरायांची प्रेरणा पुन्हा एकदा अनुभवली. यानंतर दुपारच्या दरम्यान नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांना वंदन करून, या मोहिमेची सांगता झाली.