आषाढी यात्रेसाठी पायी चालत ५३ वर्ष वारी करणारे महिपती सावंत बाबा
शिराळा प्रतिनिधी (संतोष बांदिवडेकर):पंढरपूर येथील आषाढी यात्रेसाठी राज्यातून अनेक दिंड्या पायी चालत विठू नामाचा जयघोष करत पंढरपूर च्या दिशेने मार्गक्रमण करत असलेल्या पहावयास मिळत आहेत.
शिराळा येथील महायोगी गुरु गोरक्षनाथ दिंडी ४ जुलै पासून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली असून, या दिंडीमध्ये गेले ५३ वर्षे सहभागी होऊन आषाढी एकादशीला विठुरायाचे दर्शन घेत परंपरा राखत (वय वर्ष-८५) असलेले वारकरी श्री महिपती महादेव सावंत रा. चिखलवाडी ता. शिराळा यांनी सर्व वारकरी भक्तांना हरी नामाचा गजर करीत ऊर्जा देण्याचे काम केले आहे.
जिल्हा परिषदचे माजी सदस्य रणधीर नाईक यांनी गोरक्षनाथ दिंडीमध्ये सहभाग घेऊन महिपती सावंत यांच्या तब्येतीची विचारपूस करून आधार दिला. तर गेली ५३ वर्षी एक ही वारी न चुकवता गोरक्षनाथ दिंडी मधून पायी चालत आषाढी-कार्तिकेला पांडुरंगाचे दर्शन घेत असतो.दिंडी मधून मार्गस्थ झाल्यापासून ऊन वारा पाऊस जरी असला तरी कधीही थकवा कंटाळा जाणवलेला नाही. तर प्रचंड आत्मविश्वासाच्या जोरावर चालत जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेऊन सेवा करण्याची संधी मिळत असल्याची माहिती महिपती सावंत यांनी रणधीर नाईक यांना सांगितली.
पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर या पायी चालत जाणाऱ्या दिंड्या मंदिराच्या आधार घेत विसावा घेऊन पुढे चालत आहेत.ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता शेकडो किलोमीटर अंतर पायी चालत विठुरायाच्या भेटीच्या आतुरतेने सर्व वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असल्याची माहिती रणधीर नाईक यांनी दिली.