कडवी पुलाच्या स्लॅब चे नुतनीकरण व्हावे : जनतेतून मागणी
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील दोन मोठ्या आणि संवेदनशील गावांना जोडणारा रस्ता म्हणजे सरूड येथील कडवी नदीवर असलेला पूल होय. ह्या पुलामुळे बांबवडे -सरूड रस्ता, तसेच सांगली -कोल्हापूर असे दोन जिल्हे सुद्धा एकमेकांशी बांधले जातात. परंतु या पुलावरील रस्ता मात्र नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. याची नोंद प्रशासनाने अद्याप घेतलेली नाही.
कडवी नदीवरील या पुलाच्या स्लॅब मधील लोखंडी सळ्या वर येत आहेत. त्या सळ्या कापून काढणे, हा त्याच्यावरील उपाय नव्हे. तर या पुलावरील स्लॅब टाकणे, हि काळाची गरज आहे. याहीपेक्षा शास्त्रीय मार्गाने यावर उपाय काढणे हि काळाची गरज आहे. हा पूल अनेक वर्षांपासून सर्व सामान्य नागरिकांची सेवा करीत अनेक ऊन, पावसाळे खात उभा आहे. परंतु त्याच्या आयुर्मानासाठी आपण काय करावे, हे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. कारण अनेक वर्षांपासून हा पूल उभा असल्याने त्याची डागडुजी वर-वर होत आहे. नदीच्या अंतरंगातून या पुलाला उभे राहण्यासाठी मदत व्हावी, हे सुद्धा गरजेचे आहे. २००० साली माजी आमदार स्व. संजयसिंह गायकवाड दादा यांनी वैधानिक विकास फंडातून या रस्त्याच्या दोन्ही बाजूला भराव टाकून घेतल्यामुळे पुलाला दोन्ही बाजूने मदत झाली.
त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला येणारे पावसाळ्यातील पुराचे पाणी रस्त्यावर येत होते. त्यामुळे वाहतूक बंद होत होती. या भरावामुळे रस्त्यावर पाणी येणे, बंद झाले. परंतु त्यानंतर या भरावावर डांबरीकरण करण्यात आले. पुलावर सुद्धा डांबरीकरण झाले. परंतु काही वर्षातच ते धुवून गेले. आता तर पुलाच्या स्लॅब मधील सळ्या बाहेर येताहेत. त्यामुळे अनेक दुचाकी स्वारांना याचा फटका बसत आहे. दुचाकीस्वारांच्या दुचाकीचे देखील नुकसान होत आहे.
या गोष्टींची जाणीव लोकप्रतिनिधींनी ठेवावी, आणि या पुलाच्या स्लॅब चे नुतनीकरण व्हावे, अशीच मागणी नागरिकांतून होत आहे.
