घोषणांचा प्रोटोकॉल खंडित करून, खऱ्या लाभार्थ्यांना मदत पुरवा- श्री समरजीतसिंह घाटगे
बांबवडे : घोषणांचा प्रोटोकॉल खंडित करून , खऱ्या लाभार्थ्यांना मदत पुरवा, कोकणातील वादळग्रस्तांना अद्याप मदत मिळालेली नाही. रिक्षा चालकांना जाहीर केलेले १५००/- रुपये अद्याप मिळालेले नाहीत, अशा अवस्थेत पूरग्रस्तांना सरसकट भरपाई देण्यात यावी, त्याला निकषांची कात्री न लावता खऱ्या अर्थाने मदत मिळावी, अशी मागणी म्हाडा चे माजी अध्यक्ष व भाजप चे श्री समरजीतसिंह घाटगे यांनी केली आहे.

शाहुवाडी तालुक्यातील मलकापूर नगर परिषद मधील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मलकापूर नगर परिषद चे नगराध्यक्ष अमोल केसरकर, उपनगराध्यक्ष प्रवीण उर्फ राजू प्रभावळकर व नगरसेवक यावेळी उपस्थित होते.

श्री घाटगे यावेळी पुढे म्हणाले कि, राज्य शासनाने ११,५०० रुपये कोटींच्या नुकसान भरपाई ची घोषणा केली आहे. अशा घोषणा या अगोदर शासनाने अनेक वेळा केल्या होत्या. कोकणात या अगोदर आलेल्या निसर्ग आणि तौक्ते वादळाच्या नुकसान भरपाई ची रक्कम अद्याप त्या कोकणवासियांना मिळालेली नाही. कोविड काळात रिक्षा चालकांना जाहीर केलेली १५००/- रुपयांची केलेली घोषणा केली, परंतु ती रक्कम आजही रिक्षा चालकांना मिळालेली नाही. अवकाळी पावसावेळी हेक्टरी १० हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा हवेतच विरून गेली.

असे हे घोषणांचा पाऊस पाडणारे सरकार असून, आत्तातरी शेतकऱ्याला न्याय मिळू दे. आज शेतकऱ्यांचे पंचनामे अद्यापही बाकी असताना , शासनाने नुकसान भरपाई ची रक्कम ठरवली कशी ? नदीजोड प्रकल्प अस्तित्वात आणून महाराष्ट्राला पाणी मिळावे, यासाठी प्रयत्न व्हावेत. नद्यांना भिंत घालण्याची नवी शक्कल लढवणारे सरकार निश्चितच अजब आहे.
व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई मिळवण्यासाठी त्याची नोंदणी गरजेची , त्याचे मतदार यादीत नाव असणे गरजेचे , असे निकष लावून, व्यापारी वर्गाची फसवणूक करण्याचा डाव राज्य शासन आखत आहे. यासाठी सरसकट नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी देखील श्री घाटगे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

यावेळी मलकापूर चे नगरसेवक, व कार्यकर्ते उपस्थित होते. तर बांबवडे येथून कृष्णात दिंडे, सुनील वाणी व कार्यकर्ते उपस्थित होते.