…तरच आपल्या दाराला विजयाचे तोरण बांधतो
बांबवडे : बांबवडे जिल्हापरिषद मतदारसंघात पुन्हा एकदा मानसिंगदादा व सत्यजित आबा यांच्या युतीने मतदारसंघावर आपली पकड असल्याचे सिद्ध केले आहे. या मतदारसंघात जिल्हापरिषद साठी नूतन सदस्य सौ राजकुंवर रणवीरसिंग गायकवाड, पंचायत समिती गणासाठी अभयसिंह बाळासाहेब चौगुले, व लक्ष्मी बाबुराव पाटील हे तीनही उमेदवार विजयी झाले आहेत.
या विजयासाठी उमेदवारांसह श्री मानसिंगराव गायकवाड दादा, व माजी आमदार श्री सत्यजित पाटील आबा, श्री.रणवीरसिंग गायकवाडयांचे एसपीएस न्यूज च्या वतीने हार्दिक अभिनंदन.



या मतदारसंघात पूर्वीपासून गायकवाड घराण्याची पकड आहे. व या निवडणुकीत गायकवाड घराण्यातील एकमेव उमेदवार सौ. राजकुंवर गायकवाड निवडणुकीस सामोऱ्या गेल्या होत्या. आणि त्याच अनुषंगाने पंचायत समितीचे उमेदवार देखील त्यांच्यासह निवडणुकीत उतरले होते. म्हणून गायकवाड घराण्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मंडळींनी या उमेदवारांना प्राधान्य दिले. त्याच अनुषंगाने सर्व उमेदवारांनी घरोघरी जावून जनतेचे आशीर्वाद घेतले. म्हणून त्यांना विजयश्री खेचून आणता आली. दरम्यान विरोधी उमेदवार यांनी सुद्धा घरोघरी जावून प्रचार केला. परंतु गायकवाड घराण्यातील उमेदवार म्हणून सौ राजकुंवर गायकवाड यांनी बाजी मारली. तसेच जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड यांनी देखील या निवडणुकीत आपले सर्व स्त्रोत पणाला लावले. जनतेशी संपर्क साधला. जे नाराज असतील,त्यांना समजावण्यात त्यांना यश आले. यामुळे देखील सौ गायकवाड यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.


तसेच विरोधी उमेदवार यांनी गतवेळच्या जिल्हापरिषद निवडणुकीत आपल्याच उमेद्वाला पाडण्यासाठी केलेली आखणी, आणि त्यात त्यांना आलेल्या यशाने श्री महादेव श्रीपती पाटील या स्व.संजयदादा यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्याला पराभवास सामोरे जावे लागले होते. आज त्याच संजयदादा यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेने त्याचे उट्टे काढले ,अशी चर्चा जनतेतून ऐकावयास मिळत आहे.. दुसरे, बांबवडे पंचायत समितीचे उमेदवार हे अचानक जनतेसमोर आले होते. त्यांचा जनसंपर्क कमी पडल्याने त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. दरम्यान अभयसिंह चौगुले यांची बांबवडे गावात प्रतिमा चांगली आहे. दरम्यान बांबवडे ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचाराची सर्व धुरा त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. त्यावेळी त्यांनी घेतलेले परिश्रम आणि आखणी ती त्यांना यावेळी उपयोगी पडली. त्यावेळी साधलेला जनसंपर्क, याचा फायदा त्यांना या निवडणुकीत झाला. पंचायत समितीच्या दुसऱ्या विजयी उमेदवार सौ लक्ष्मी बाबुराव पाटील यांना त्यांचे पती बाबुराव पाटील यांच्या जनसंपर्काचा फायदा झाला. ते पिशवी गावाचे माजी सरपंच होते. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क मोठा होता. त्यांनीदेखील आपला सर्व जनसंपर्क कामास लावला, आणि सौ लक्ष्मी पाटील यांची विजयश्री खेचून आणली. हि बाब खूप महत्वाची आहे. कारण श्री नामदेव पाटील हे जनसुराज्य शक्ती पल्शाचे खंदे समर्थक आहेत. पिशवी गावात सावकार साहेबांना मानणारा मोठा गट आहे. परंतु या गटाला पिशवी बाहेर जावून आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यात अपयश आले.हे देखील सौ लक्ष्मी पाटील यांच्या विजयाचे कारण असू शकते. तसेच पलीकडील पाच गावात मानसिंग दादा व सत्यजित पाटील आबा यांनी फिल्डिंग टाईट केल्याने सौ लक्ष्मी पाटील या विजयी झाल्या.
एकंदरीत काय, केवळ पैशाच्या बळावर निवडणूक जिंकता येत नाही,तर त्यासाठी लोकांशी जनसंपर्क असणे, गरजेचे असते. तसेच सर्वसामान्य जनतेची कामे करणे गरजेचे असते. तरच जनताजनार्दन आपल्या पाठीशी उभा राहतो, आणि आपल्या दाराला विजयाचे तोरण बांधतो.
