दुर्गम तालुक्यातील विद्यार्थ्यांची मुख्यमंत्र्यांना ” करुण साद “
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील पोलीस भरती साठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांनी २०१९ साली जाहीर केलेल्या पोलीस भरती ची जाहिरात सध्याच्या काळात त्वरित प्रसिद्ध करून बेरोजगारीच्या गर्तेत जाणाऱ्या स्वाभिमानी विद्यार्थ्यांना वाचवावे, अशा आशयाचे निवेदन ” ध्येय अकॅडमी ” चे शिक्षक श्री अल्लाबक्ष मुल्ला व त्यांच्या सोबत तालुक्यातील पोलीस भरती चे विद्यार्थी यांनी शाहुवाडी चे तहसीलदार, व पोलीस निरीक्षक विजय पाटील यांना देण्यात आले. दरम्यान हे निवेदन मुख्यमंत्री यांना सुद्धा देण्यात आले आहे.

पोलीस खात्याचे ‘ आयडॉल ‘ असलेले विश्वासराव नांगरे-पाटील कधी काळी म्हणाले होते कि, हि दुर्गम भागातील तरुण मुले म्हणजे रानफुले असून, यांना संधी मिळाल्यास शहरातील गुलाबांना सुद्धा लाजवतील. अशा या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना करुण साद घातली आहे.

शाहुवाडी तालुका हा दुर्गम तालुका आहे. इथं नोकरी ची दुसरी संधी नाही. यासाठी येथील विद्यार्थी शासकीय , तसेच पोलीस भरती साठी सतत प्रयत्नशील असतात. त्यासाठी लेखी परीक्षांची तयारी हे विद्यार्थी करतात. त्याचबरोबर फिजिकल ट्रेनिंग साठी सतत सराव करीत असतात.


२०१९ सालापासून पोलीस भरती न झाल्याने अनेकांची वयोमर्यादा संपत आली आहे.
२०२० साली आलेल्या कोरोना मुळे घरची आर्थिक परिस्थिती अगोदरच ढासळली आहे. आणि पोलीस भरती न झाल्यास अनेक तरुण पात्रता असतानाही वयोमर्यादेच्या कारणस्तव बेरोजगारीच्या गर्तेत ढकलले जातील. यासाठी लवकरात लवकर पोलीस भरती जाहीर करावी, अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देखील पाठवण्यात आले आहे.