बांबवडे चे तुंबवडे होणार ? : आपत्ती व्यवस्थापन विभागाने लक्ष घालण्याची गरज
बांबवडे : पाण्याच्या प्रवाहात गतिरोधक निर्माण केल्यामुळे पाण्याचा प्रवाह पुढे गतिशील रहात नाही. त्यामुळे हे पाणी इतरत्र पसरते. परिणामी पाणी गावात शिरते, व नागरिकांचे नुकसान होते. यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष घालून संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना देवून बांबवडे इथं ,बांबवडे चे तुंबवडे होण्यापासून थांबवावे. अशी मागणी बांबवडे तील नागरिकांतून होत आहे.

बांबवडे तालुका शाहुवाडी इथं बांबवडे गाव सुरु होतानाच अंबीरा ओढा लागतो. या पुलाला खाली पाण्याचा प्रवाह , प्रवाहित राहण्यासाठी खाली पाच दरवाजे आहेत. यापैकी केवळ तीन दरवाजे सुरु असून, दोन दरवाजे गाळाने बंद झाले आहेत. हा गाळ काढून पाणी प्रवाहित राहण्यासाठी हायवे खात्याकडून काम सुरु करावे. अन्यथा भविष्यात पाण्याचा प्रवाह गावात शिरला, तर त्यास हायवे खाते जबाबदार राहील.

तसेच अंबीरा ओढ्याचा प्रवाह पात्रात काही मंडळींनी अतिक्रमण केल्याने पाणी गतिशील रहात नाही. यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने पावसाळ्यापूर्वी लक्ष घालावे.

याचबरोबर गेल्या वर्षी बांबवडे चा पाझर तलाव भरून, धरणावरून पाणी पलीकडे गेले होते. यामुळे तलावाचे धरण फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान तलाव उलटण्यासाठी, काही अनैसर्गिक कारणे सुद्धा आहेत. त्यापैकी स्मशानशेड च्या मागे असलेली वसाहत ने रस्त्यावर येण्यासाठी कोणाच्यातरी संगनमताने रस्ता निर्माण केला. यासाठी काही गोष्टी घडल्या आहेत. येथील कोल्हापूर टाईप बंधारा देखील गायब झाला आहे. दरम्यान या वसाहत मालकाने मुख्य रस्त्यावर येण्यासाठी रस्ता निर्माण केला. पण खाली पाणी प्रवाहित राहण्यासाठी केवळ काही पाईप घातले आहेत. परंतु ते अपुरे असल्याने पाणी बॅक वॉटर ने मागे जाते, आणि पावसाचे पाणी बांबवडेच्या पाझर तलावाच्या धरणावरून वाहिले होते.

यंदासुद्धा हीच परिस्थिती राहिल्यास धरण फुटण्याचा धोका नाकारता येत नाही. यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने याकडे त्वरित लक्ष घालावे, अन्यथा बांबवडे इथं वित्तहानी सह जीवितहानी सुद्धा होवू शकते. यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्वरित लक्ष घालावे. बांबवडे नागरिकांचे होणारे नुकसान टाळावे, अशी मागणी सुद्धा बांबवडेकरांकडून करण्यात येत आहे.