बांबवडे येथील कालव्याचे सुरु झालेले बांधकाम केवळ कंत्राटदारांसाठी ?
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे येथील शेतातून जाणाऱ्या कालव्याचे बांधकाम पुन्हा सुरु करण्यात आले आहे. ह्या कालव्याचे बांधकाम गेली तीस वर्षे सुरु असून, त्याचा फायदा अद्याप कोणालाही झालेला नाही. त्यामुळे या कालव्याचे बांधकाम केवळ कंत्राटदार,ठेकेदार यांच्यासाठी सुरु केले आहे का ? असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जात आहे. या बांधकामामुळे शासनाचे कोट्यावधी रुपये ठेकेदारांच्या खिशात जात आहेत.

बांबवडे तालुका शाहुवाडी इथं शेतासाठी पाणी मिळावे, यासाठी कालव्याचे बांधकाम सुरु करण्यात आले होते. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने शासनाने घेतल्या. आणि शेतकऱ्याने सुद्धा भविष्यात आपल्या शेताला पाणी मिळेल, या भाबड्या आशेसाठी दिल्या होत्या. परंतु एक पिढी या कालव्याच्या उभारणी पासून संपली, तरीही अद्याप कालवाच पूर्ण झालेला नाही, तर पाणी कुठून मिळणार? हे वास्तव समोर येत आहे.

या कालव्यासाठी अनेक कोटी रुपये खर्च करण्यात आले असूनही, अद्याप इथं कालवा उभारलेला नाही. काहीठिकाणी पिलर उभे केले गेले. या व्यतिरिक्त इथं कालवा नाही. असे असतानाही, तसेच या कालव्याची खर्चाची रक्कम दिवसेंदिवस अनेक पटीने वाढत आहे. तसेच कालवा उभारण्यापूर्वी हा कालवा आणि जवळूनच वाहणारी कडवी नदी यांचं हवाई अंतर देखील खूपच कमी आहे. या कालवा मंजुरी नंतर अनेक गावांनी नदीवरून पाणी योजना आप-आपल्या गावात नेली आहे. यावरून हा कालवा जरी उभारला गेला तरी त्याचा फायदा कोणाला होणार ? हासुद्धा प्रश्नच आहे.

त्यामुळे ह्या कालव्याचे सुरु झालेले बांधकाम म्हणजे केवळ कंत्राटदार आणि ठेकेदार यांची पोटे भरण्यासाठी केले गेलेले पांढरे षड्यंत्र आहे का ? असा प्रश्न सुद्धा शेतकऱ्यांना पडला आहे.