भगव्याची लाट हीच माझ्या विजयाची पहाट ठरेल – सत्यजित पाटील सरूडकर
( उज्वला कोकणे )
सरूड प्मरतिनिधी : हाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांची एकजूट, सर्व सामान्य जनतेने हाती घेतलेली निवडणूक, तरुण आणि महिलांचा मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद या जोरावरच ही लोकसभा निवडणुक आपण मोठ्या मताधिक्याने जिंकणार असल्याचा आशावाद महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रभर असलेली भगव्याची झंजावाती लाट हीच माझ्या विजयाची पहाट असणार आहे, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आमच्याशी दिलखुलासपणे चर्चा केली. ते पुढे बोलताना म्हणाले की ,आपण एका सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातून आलो आहोत. माझे वडील माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर हे शाहूवाडी पन्हाळ्याचे दोन वेळा आमदार होते. मी स्वतः विधानसभेत दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे .लोकप्रतिनिधी म्हणून मला अनुभव आहे. जनतेच्या सुखदुःखाशी समरस होणारा मी कार्यकर्ता आहे.शाहूवाडी पन्हाळ्यातील जनता मला ओळखते.या भागात मला प्रचंड मताधिक्य मिळेलच शिवाय हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील पूर्ण सहाही तालुक्यांमध्ये मला भरघोस मताधिक्य मिळेल. मला सर्वांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळतो आहे.निष्कलंक, कष्टाळू, मेहनती चेहरा म्हणून लोक माझ्याकडे आशाने पाहत आहेत.
विद्यमान खासदार आमच्यामुळे लोकसभेत निवडून गेले होते. आम्ही त्यांच्यासाठी गेल्या निवडणुकीत ताकतीने काम केले होते. त्यांनी आपले इमान गहाण ठेवले . निष्ठा गहाण ठेवली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या व निवडून दिलेल्या मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसून ते निघून गेले. त्यामुळे त्यांना निवडून दिलेल्या जनतेचा त्यांच्यावरती प्रचंड रोष आहे. त्यांचा मतदारसंघात संपर्क नाही. ते ज्या विकास कामांचा दावा करत आहेत तो सुध्दा बोल ठरला आहे. भाजपच्या सर्वेक्षणात ते निवडून येणार नाहीत अशी माहिती पुढे आल्यानंतर त्यांच्या उमेदवारीवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. त्यांच्याबद्दलची नाराजी स्पष्टपणे दिसून येत आहे. विरोधी उमेदवार शेतकऱ्यांसाठी निवडणूका डोळ्या समोर ठेऊन काम करतात. परंतु त्यांच्याकडूनही शेतकरी जनतेचा भ्रमनिरास झालेला आहे.शेतकरी तसे बोलून दाखवत आहेत. मतदार संघाचा कायापालट करण्यासाठी तिसरा सक्षम पर्याय म्हणून माझ्याकडे लोक पाहत आहेत.म्हणूनच ही निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल काय लागणार हे स्पष्ट झाले आहे. मोठ्या मताधिक्यांनी या मतदारसंघातून मी निवडून येणार आहे.
खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर मतदारसंघात योग्य संपर्क ठेवून विकास कामांची गंगा आणण्याचे माझे स्वप्न आहे. युवकांचे ,महिलांचे प्रश्न, शेतकरी व कष्टकरी लोकांच्या प्रश्नांसाठी मतदारसंघातील औद्योगिक प्रकल्प, विकास कामे यासाठी आपण काम करणार आहोत. इचलकरंजीतील पाण्याचा प्रश्न असू दे , दळणवळणाचा,पाणी, आरोग्य, शिक्षण, औद्योगिक सुविधा असू देत या संदर्भात आपण अहोरात्र झटणार आहोत. महाविकास आघाडीचे सर्व नेत्यांच्या व आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या मतदारसंघांमध्ये रचनात्मक बदल घडवून आणण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील असणार आहे.
केंद्रातील सत्तास्थानी असलेले लोक धर्माचे राजकारण करत आहेत.आपल्याला विकासासाठी राजकारण करायचे आहे .सर्व समाजात संविधान बदलाबाबत चर्चा सुरू आहे.आपण तर संविधान मानणारे लोक आहोत.गोरगरिबांच्या उन्नती साठी आम्ही प्रयत्नशील आहोत.सर्वांना सोबत घेऊन विकासाचा प्रवाह गतिमान करायचा आहे. विरोधकांच्या सारखे कोणत्याही प्रकारचे सूडाचे राजकारण आपण कधीच करणार नाही. आमची ती संस्कृती नाही. उलट सर्वांना सोबत घेऊन सर्वसमावेशक राजकारणाचा एक कृती कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत.
महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची भक्कम एकजूट आणि आदरणीय उद्धव ठाकरे साहेब व आदरणीय शरद पवार साहेब यांच्या बद्दल जनतेच्या मनात असलेली प्रचंड सहानुभूती या गोष्टी मला विजयापर्यंत घेऊन जातील. बंटी पाटील साहेब, जयंत पाटील साहेब, गणपतराव पाटील साहेब, माजी आमदार उल्हास दादा पाटील, सुजित मिनचेकर, आमदार मानसिंगराव नाईक भाऊ, माजी मंत्री शिवाजीराव नाईक साहेब, आमदार राजू बाबा आवळे, माजी आमदार राजीव आवळे त्याचबरोबर शाहूवाडी तालुक्यातून मानसिंग दादा गट तसेच काही संघटना या सर्वांचे मला सहकार्य आहे. पाठबळ आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वसामान्य जनता माझ्यासोबत आहे. त्यामुळे मी नक्कीच विजयापर्यंत जाणार यात शंका नाही.
गटातटाचे कोणतेही राजकारण न करता संपूर्ण हातकणंगलेत मतदारसंघाच्या कायापालटासाठी आपण अहोरात्र मेहनत करणार आहोत. विकासाचे आणि विधायक राजकारणाचे एक नवे पर्व सुरू करण्याची आपली इच्छा आहे. या नव्या विधायक बदलासाठी मतदारसंघातील तरुण, महिला भगिनी, सर्व कार्यकर्ते आणि सुज्ञ जनता माझ्या पाठीशी निश्चितपणाने उभी राहणार आहे.
या मतदारसंघातील जनता अत्यंत सुज्ञ आहे.ती योग्य निर्णय घेऊन निष्क्रिय आणि गद्दार उमेदवारांना खड्यासारखे बाजूला ठेवून माझ्यासारख्या कष्टाळू आणि प्रामाणिक व्यक्तिला आपला आवाज म्हणून संसदेत नक्कीच पाठवेल, असा मला विश्वास आहे .
या मतदारसंघात रचनात्मक आणि विधायक राजकारणाचे पर्व सुरू करण्यासाठी आपण मला साथ द्यावी व मशाल चिन्हासमोरील बटण दाबून भरघोस मतांनी निवडून द्यावे.