भूस्खलन झालेल्या शेतकऱ्यांना वेगळे निकष लावावेत,अन्यथा उपोषण- श्री विजय खोत
शाहुवाडी : शाहुवाडी तालुक्यात झालेल्या पूर परिस्थितीमुळे शासनाने पंचनामे चे निकष लावले आहेत. परंतु भूस्खलन मुळे झालेल्या नुकसानीचे वेगळे निकष लावलेले नाहीत. या भूस्खलनामुळे शेतातील पिके जमिनीत गाडली गेली आहेत. अशावेळी शेतकरी आयुष्यातून उठला आहे. अशावेळी भूस्खलन बाबत वेगळे निकष लावले जावेत, आणि त्यानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी,अन्यथा आम्ही शेतकऱ्यांसह उपोषणास बसू, असे मत शाहुवाडी पंचायत समिती चे सभापती श्री विजय खोत यांनी व्यक्त केले.

शाहुवाडी पंचायत समिती ची मासिक सभा आज दि. ६ ऑगस्ट २०२१ रोजी पंचायत समिती च्या सभागृहात संपन्न झाली. यावेळी श्री विजय खोत बोलत होते. यावेळी प्रारंभी गटविकास अधिकारी अनिलकुमार वाघमारे यांनी सभागृहाचे स्वागत केले.

नुकत्याच आलेल्या पुराने तालुक्यात खूप नुकसान केले आहे. दरम्यान यावेळी अनेक मंडळींनी पूर परिस्थितीत आपले जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावले. अशा सर्व कर्तबगार मंडळींचे यावेळी सन्मानपत्र देवून अभिनंदन करण्यात आले. यावेळी वीज वितरण कंपनी चे पदाधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी पशुधन विभागाचे पदाधिकारी व कर्मचारी यांचे देखील अभिनंदन करण्यात आले. दरम्यान पूर परिस्थितीत पोलीस निरीक्षक विजय पाटील, व सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख व पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील आपले जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावले, याबद्दल त्यांचेदेखील अभिनंदन करण्यात आले. याचबरोबर प्राथमिक शिक्षक संजय जगताप यांना पीएचडी पदवी मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. दरम्यान याकाळात शाहुवाडी तालुक्यातील पत्रकारांचे देखील बुके देवून अभिनंदन करण्यात आले. यावेळी शाहुवाडी तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार एसपीएस न्यूज व साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स चे संपादक मुकुंद पवार, बिपिएन चे प्रतिनिधी रमेश डोंगरे, महासत्ता चे प्रतिनिधी संजय जगताप यांनी सर्व पत्रकारांच्या वतीने सन्मान स्वीकारला.

यावेळी सभापती खोत पुढे म्हणाले कि, पूरग्रस्तांसाठी ३ इंचाचे निकष लावले आहेत. परंतु भूस्खलन झाल्यामुळे डोंगराचा भाग शेतात येवून पडला आहे.त्याबाबत शासनाने काहीच निकष लावलेले नाहीत. ज्यांच्या शेतात पाच फुटांपेक्षा अधिक गाळ,डोंगर,झाडे वाहून आले आहेत. त्यांचे पंचनामे वेगळे नमूद करून शासनाला पाठवावेत.

दरम्यान शाहुवाडी तालुक्यातून महिला बाल विकास विभागाच्या पाच पर्यवेक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्या ऐवजी इतर पर्यवेक्षक तालुक्यात आलेले नाहीत.याची नोंद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पर्यंत पाठवावी.

यावेळी अमर खोत म्हणाले कि, या पूर परिस्थितीत ज्यांची जनावरांची शेड वाहून गेलीत,त्यांचे फोटो का काढले नाहीत, अशी विचारणा होत आहे. त्यांची नोंद का नाही,असे विचारले जात आहे. जरी नोंद नसली तरी शेड तिथे नव्हते, असे होत नाही. यामुळे सरसकट पंचनामे व्हावेत,अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान ज्या शाळा ,कॉलेज कोविड सेंटर साठी घेतल्या आहेत, त्या शाळा, त्या संस्थांना परत कराव्यात. कारण यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
यावेळी कोरडवाहू जमिनींसाठी ६८००/- रु. प्रति हेक्टर, बागायत साठी १३,५००/- रु. तर फळबागांसाठी १८५००/- रु. नुकसान भरपाई शासनाने जाहीर केली आहे.
यावेळी उपसभापती दिलीप पाटील, पांडुरंग पाटील, डॉ.स्नेह जाधव, सुनिता पारळे, आदी सदस्यांसहित सर्व विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.