मी तुमच्या शेतातील म्हसोबा आहे – श्री राजू शेट्टी
बांबवडे : माझी नाळ शेतकऱ्याच्या मातीशी जोडलेली आहे. मी तुमच्या शेतातील उसाच्या फडाचा राखण्या म्हणजेच म्हसोबा आहे. आपण आपल्या रानातील राखण्याला वर्षाला परडी देतो. मी तर पाच वर्षांनी मतांची परडी मागतोय. त्याशिवाय उठलेली भूतं कायमची शांत करता येणार नाहीत. असे भावनिक उद्गार माजी खासदार श्री राजू शेट्टी यांनी काढले.
साळशी तालुका शाहुवाडी इथं झालेल्या कोपरा सभेत ते बोलत होते. यावेळी शिराळा, वाळवा, शाहुवाडी, येथील अनेक वक्त्यांनी मनोगते व्यक्त केलीत .
यावेळी श्री शेट्टी पुढे म्हणाले कि, नागपूर महामार्ग साठी ज्या जमिनी संपादन केल्या. ती शेतकऱ्यांच्या मालकीची होती. त्या जमिनीचे पैसे मिळवण्यासाठी सुद्धा दलालांनी हात धुवून घेतले. भविष्यात शक्तीपीठ महामार्ग येणार आहे. त्याच्यासाठी सुद्धा जमिनी घेण्यात येतील. पण आता जमीन द्यायच्या नाहीत. नेहमी तुमच्यासाठी जमिनी देवून आमची पुढची पिढी काय करणार. सत्ताधारी शेतकऱ्यांची जमीन हस्तगत करण्यासाठी बहुमताच्या जीवावर कायदा करून, जबरदस्तीने जमिनी अधिग्रहित करणार आहेत. हे आपण हाणून पाडलं पाहिजे. अन्यथा एकदिवस शेतकरी जो या सगळ्यांचा पोशिंदा आहे, तोच भूमिहीन होईल. सध्याची संसदेतील मंडळी शेतकऱ्यांच्या विषयावर संसदेत तोंड उघडत नाहीत. तेंव्हा आपल्याला आपलं अस्तित्व टिकवायचं असेल, तर मतांची परडी माझ्या नावावर सोडा, मी तुम्हाला निराश करणार नाही. असेही श्री शेट्टी यांनी यावेळी सांगितले.