सामाजिक

मैत्रीच्या हृदयावरील अनभिषिक्त सम्राट म्हणजे ” गौतम सर “


बांबवडे :मैत्रीच्या हृदयावरअनभिषीक्त राज्य करणारं व्यक्तिमत्व म्हणजे गौतम कांबळे सर. दलित, शोषित ,पिडीत समाजातील तरूण वर्गाला मैत्रीचा आणि हक्काचा आधार देणारं, आधारवड म्हणजे गौतम कांबळे सर, दलित समाजावर होणाऱ्या अन्यायाला धडक देण्यासाठी , गल्ली ते दिल्ली, जाणारा एक चिरतरूण नेतृत्व म्हणजे गौतम सर, दलित समाजातील बायाबापड्या , मायमाऊली,यांच्या पायाला स्पर्श करून आशिर्वाद स्विकारणारं एक आगळं,वेगळं व्यक्तिमत्व म्हणजे गौतम सर,आणि दलित समाजातील तरुणांच्या हृदयाची धार म्हणजे गौतम सर ,असे हे व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही,हे त्रिकालाबाधित सत्य कुणालाही पचविता येत नाही. परंतु ते खरं आहे. अशा ह्या अनभिषक्ति सम्राटाला मैत्रीच्या ओंजळीतून वाहिलेली भावपूर्ण शब्दांजली.


काळाने असा काही घाव घातला कि, केवळ हृदयच नाही तर छाती देखील फाटून गेली, सध्याच्या काळात केवळ दलित समाजालाच नव्हे तर बहुजन समाजाला सुध्दा गौतम सर एक आधार होते. अवघ्या महाराष्ट्रात सरांना कुठेही कॉल केला, तर सर आपल्या मदतीचा हात त्या त्या लोकांपर्यंत कसा पोहचवायचे ते कळायचे सुध्दा नाही, सरांचे मैत्रीचे नाते कुठे कुठे विणलेले होते, ते कुणालाच माहित नव्हते, सरांनी आजवर कधी गरीबाला त्रास होवून दिला नाही. कोणत्याही माय माऊली ला त्रास दिला नाही. आज त्यांच्या जाण्याने शाहूवाडीतील अनेक दलित समाजाच्या घरात ह्या दुखाच्या सावटाखाली चूल पेटलेली नसावी. अनेक वाईट प्रसंगातून,समाज जात असताना, समाजाच्या काळजाचा तुकडा नव्हे, तर काळाने काळीजच काढून नेलं, असं म्हटल्यास अतिशयोक्ती वाटू नये. सर जरी दलित समाजात जन्माला आले तरीही बहुजन समाजामध्ये त्यांची मैत्री उल्लेख करण्याजोगी आहे, अनेक प्रसंगांमध्ये साथ देणारे हे व्यक्तिमत्व आज मात्र निरभ्र आकाशात कधीही न परतण्यासाठी झेपावलं आहे, हि बहुजन समाजाची भरून न निघणारी पोकळी आहे.


शाहूवाडी तालुक्याची माती हि नेहमीच अनेक वीररत्नांची खाण आहे, या रत्नांच्या खाणीत हा हिरा डोणोली गावात जन्मला. घरची परिस्थिती बेताची, परंतु भारदस्त आवाज, वाद्य वाजवण्ङ्माची कला, आणि सुरेल गळा,हि नैसर्गिक देणगी गौतम सरांना मिळाली होती. ह्या माध्यमातून सरांनी अनेक कार्यक्रमात गाणी सुध्दा म्हटली आहे. अशा बेताच्या परिस्थितीही शिक्षणाची कास मात्र ह्या पठ्याने सोडली नाही, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या छत्रपती शाहू महाराज,,महात्मा जोतीबा फुले यांच्या आचारांशी नेहमीच प्रामाणिक राहिले, त्यामुळे तत्कालीन कोडोलीचे आमदार यशवंतराव एकनाथ पाटील यांच्या शाळेत ते शिक्षक म्हणून काम करू लागले, त्या काळात दमदार आवाज, शिक्षण हे वाघणिचे दूध आहे, हे आंबेडकरी विचार,आचरणात आणून त्यांनी नोकरी पत्करली, आणि आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालविला, हे सर्व करत असताना, साहजिकच चळवळ मात्र त्यांना गप्प बसू देत नव्हती, सुरूवातीला साहजिक संघटनेतून काम करताना त्यांनी आपलं वैचारिक प्रभुत्व समाजासमोर ठेवले आणि समाजाने सुध्दा त्यांचे वैचारिक प्रभुत्व स्विकारले. हे करत असताना, गोरगरिबांना ,शोषित पिडीतांना मात्र मदत करण्याचे काम मात्र ते विसरले नाही, त्यामुळे दिन दलित, शोषित,पिडित तरूणाईची फळी गौतम सरांच्या पाठिशी ठाम पणे उभी राहिली आणि आजही आहे, दरम्यानच्या काळात वैचारीक पातळीवर मात्र त्यांनी भरतीय दलित महासंघाची स्थापना केली, आणि आपला समाजकारणाचा प्रवास सुरू ठेवला.


भारतीय दलित महासंघाच्या माध्यमातून राज्यभर अनेक शाखांची निर्मिती करून, त्यांनी सामाजिक चळवळ उभी केली. त्यांच्या एका वाढदिवसानिमित्त राज्यातून सुमारे 75 वाहने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दाखल झाल्या होत्या. . गौतम सर म्हणजे शेणावर सारवलेल्या जमिनीवर पांढऱ्या कपड्यावर बसणारं व्यक्तिमत्व . त्यांनी कधीही खुर्चीची अपेक्षा केली नाही, असे ते व्यक्तिमत्व होतं. ताई,आजी,मावशी , वहिणी, अशी जिव्हाळ्याची साद घालणारं व्यक्तिमत्व , हे मात्र आज जिव्हाळ्याच्या पलीकडे जाऊन बसलंआहे. भारतीय दलित महासंघाच्या माध्यमातून त्यांनी समाजावर होणाऱ्या अनेक अन्यायाला वाचा फोडली . दलित समाजाला मिळणारा हक्काचा निधी इतरत्र वळविला जायचा. त्यावेळी सुध्दा आपली भूमिका त्यांनी चोख बजावली. आणि सर्वसामान्य वर्गाला विकासाचं पर्व सुरू करून दिलं. परंतु या बहाद्दाराने मात्र आपली मुलं चांगल्या रितीने शिकविली,ज्या माध्यमातून आपल्या घरातील आर्थिक चणचण दूर होईल , हे त्यांनी दलित समाजाला पटवून सांगितले, कुठल्याही धर्माला विरोध न करता,आपली भूमिका त्यांनी सर्व समाजाला पटवून सांगितली,


आज जरी ते हयात नसले, तरी त्यांच्या आठवणींची शिदोरी प्रत्येकाच्या हृदयाच्या एका कप्प्यात जपलेली असेल, आणि त्यातून झिरपणारे दुखाश्रू मात्र एवढ्या लवकर शांत करणार नाही, आयुष्यात अनेक मंडळी व्यासपीठावर येतात, राजकारणात येतात, ,समाजकारणात येतात. परंतु हे सर्व करीत असताना, समाजातील अगदी लहान मुलापासून 80 ८० वर्षांच्या वृद्धापर्यंत डोळ्यात पाणी आणणारं व्यक्तिमत्व म्हणजे गौतम सर. आज हे आम्ही लिहित आहोत, हि सुध्दा एक मैत्रीची शब्दांजली आहे. ज्यांच्या अनेक पत्रकार परिषदा झाल्या., अनेक आंदोलने झालीत, डॉ.बाबाहेसाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा गौतम सरांच्या खांद्यावर आम्ही नेहमी पाहिला, हे खांदे तेवढे सक्षम होते. परंतु काळाच्या ओघात तब्येतीच्या अस्वास्थ्यामुळे ते थोडेसे बाजुला झाले, आपले धाकटेबंधू श्रीकांत कांबळे(आप्पा)यांच्या खांद्यावर सामाजिक मदार त्यांनी सोपवली. आणि श्रीकांत यांनी सुध्दा आजपर्यंत ती जोपासली आहे. गेल्याच महिन्यात ठेकेदार आणि अधिकार यांच्या संगनमताने दलित समाजाच्या निधीवर डल्ला मारला.,त्या प्रकरणाची चौकशी लावण्यासाठी शाहूवाडीत त्यांनी आंदोलने केलीत, त्या बांधकामाची गुणवत्तेची चौकशी करण्यास शासनास भाग पाडले.


गौतम सर म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील, एक निळं वादळ होतं. गौतम कांबळे सर आपल्या दलित समाजाच्या चुलीची काळजी करणारे एकमेव समाजसेवक होते. आपल्या समाज बांधवांना दोन वेळचा घास मिळावा , असा त्यांचा ध्यास होता. परंतु काळाने मात्र असा काही घाव घातला कि, हे वादळ भावनांच्या कल्लोळात उडून गेलं, आणि समाज मात्र आजही गौतम सरांच्या बोटाची आजही वाट पहात आहेत.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!