रेशन दुकानदारांना शासनाने समजून घ्यावे, विविध मागण्या : गामाजी ठमके
बांबवडे : रास्त भाव धान्य दुकानदार संघटना शाहुवाडी यांच्यावतीने अनेक मागण्यांचे निवेदन कोल्हापूर जिल्हा रास्त धान्य दुकानदार संघटनेचे उपाध्यक्ष गामाजी ठमके यांच्या हस्ते शाहुवाडी चे तहसीलदार गुरु बिराजदार यांना देण्यात आले.
शाहुवाडी तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकानदारांवर होणाऱ्या कारवाया या काही लाभार्थ्यांच्या गैरसमजातून होत असून, याच्या मागील वस्तुस्थिती वेगळी आहे. यासाठी संघटनेने शासनाकडे काही मागण्या केल्या आहेत. ज्यायोगे लाभार्थी ग्राहक आणि दुकानदार यांच्यातील गैरसमज दूर होतील.
शासनाच्या आदेशाप्रमाणे ग्राहकांचे थंब घेवून रेशन वितरीत करणे आहे. परंतु सध्याच्या कोरोना विषाणू संसर्गाच्या वातावरणात लाभार्थी ग्राहक रेशनसाठी दुकानाच्या दारात गर्दी करतात. त्यामुळे सोशल डीस्टंसिंग चे उल्लंघन होत आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांसोबत कोरोनामुळे दुकानदाराच्या जीवितासही धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत ग्राहकाचा थंब घेणे, धोकादायक आहे. तेंव्हा दुकानदाराच्या सुरक्षिततेसाठी मास्क, सॅनिटायझर, हात धुण्यासाठी साबण, हातमोजे, पीपीई कीट शासनाने पुरवावे. तसेच कोरोना विषाणू संक्रमणाचे वातावरण शांत होईपर्यंत, दुकानदाराचा थंब घेवून धान्य वितरीत करण्याची परवानगी मिळावी.,
केंद्र शासनाने घोषित केलेले मोफत तांदूळ वितरीत केल्यानंतर त्यावरील कमिशन शालेय पोषण आहार प्रमाणे रोख स्वरुपात मिळावे.
धान्य वाटप वेळी लाभार्थ्यांनी कार्डावर वाढवलेली नावे (युनिट) महाई सेवा केंद्राकडून ग्राहकांनी ऑनलाईन करून घ्यावीत. कारण शासनाकडून आलेले धान्य अंत्योदय व प्राधान्य नावांप्रमाणे आलेले असते. त्यानंतर कार्डावर वाढवलेली नावे ऑनलाईन नसल्याने त्यांचे धान्य शासनाकडून उपलब्ध होत नाहीत, आणि त्यामुळे दुकानदार आणि ग्राहक यांच्यात नाहक संघर्ष वाढतो.
यामुळे दुकानदारांना आपल्या ग्राहकांना सेवा देण्यास कोणतीही अडचण येणार नाही. तसेच यामुळे वादावादी चे प्रसंग निर्माण होणार नाहीत.
यावेळी एसपीएस न्यूज शी बोलताना गामाजी ठमके म्हणाले कि, दुकानदार, हे काही ग्राहकांचे शत्रू नसून, त्यांचे नेहमीच सौहार्दाचे संबंध असतात. परंतु काही गोष्टींची माहिती ग्राहकांपर्यंत न पोहोचल्यामुळे हे वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. यासाठी ग्राहकांनी दुकानदारांना समजून घ्यावे, जि मंडळी चुकीची कामे करतात, त्यांच्याविषयी शासकीय कारवाई होईलच, परंतु एकाच चष्म्यातून सर्व दुकानदारांना पाहू नये, अशी विनंती सुद्धा गामाजी ठमके यांनी केली. यावेळी बापू शिंदे, जालिंदर पाटील व अन्य दुकानदार उपस्थित होते. यावेळी सोशल डीस्टंसिंग सुद्धा पाळण्यात आले होते.