प्रशासकीयराजकीयसामाजिक

  वन विभागाला जनतेशी घेणेदेणे नाही- उपसभापती अमरसिंह खोत पंचायत समिती मासिक सभा भाग १

  बांबवडे : शाहुवाडी वन परिक्षेत्र अधिकारी उज्वला मगदूम या सर्वसामान्य जनतेच्या रोषाला घाबरून शाहुवाडी पंचायत समिती च्या पहिल्या मासिक सभेला हेतू पुरस्सर गैरहजर राहिल्या आहेत. याबद्दल  त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला.  त्यांनी पुढील मासिक सभेला आवर्जून उपस्थित राहावे.असे मत शाहुवाडी पंचायत समिती चे नूतन उपसभापती अमरसिंह खोत यांनी व्यक्त केले.

शाहुवाडी पंचायत समिती ची २०२६ या पंचवार्षिक मधील पहिली मासिक सभा दि. ६ एप्रिल २०२६ रोजी संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सौ प्रियांका भोसले या उपस्थित होत्या. सचिव म्हणून गटविकास अधिकारी मंगेश कुन्चेवार यांनी काम पाहिले. सुनील ईश्वरा पाटील हे सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून उपस्थित होते. तसेच उपसभापती म्हणून श्री अमरसिंह खोत यांनी या मासिक सभेत  मोठ्या उत्साहाने मुद्दे मांडले. ते या पंचायत समितीमध्ये अनुभवी सदस्य आहेत. यावेळी सभापती प्रियांका भोसले, उपसभापती अमरसिंह खोत यांच्यासहित सर्वच सदस्यांचा पंचायत समिती च्या वतीने शाल पुष्प देवून सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित असलेल्या सर्वच पत्रकारांचा देखील पुष्प देवून सत्कार करण्यात आला. तसेच राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी उपसभापती अमरसिंह खोत पुढे म्हणाले कि, वन खाते आपली जबाबदारी टाळत असल्याचे दिसत आहे. जंगलातील वन्य प्राणी नागरी वस्तीत येत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान करीत आहेत. तरी अधिकारी वर्ग मात्र यावर काहीच करताना दिसत नाही. शेतीच्या नुकसानी सोबत शेतकऱ्यांच्या जीवितास देखील हानी पोहचत आहे. तरीदेखील केवळ नाममात्र नुकसान भरपाई देवून आपली जबाबदारी टाळत आहेत. दरम्यान वन खात्याचे खाजगी कंपनी चे सुरक्षा अधिकारी शेतकऱ्यांना वन क्षेत्रात गेल्यास मारहाण करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. हि गोष्ट चुकीची आहे. भविष्यात असे काही घडल्यास शेतकरी देखील पलटवार करतील, आणि त्यांना आमच्या सर्वांचे सहकार्य राहील, याची नोंद घ्यावी.

दरम्यान वन विभागात सुरु असलेल्या कामांच्या निविदा काढल्या जातात का ?, कि ,ठेकेदार आणि वन खाते आपापसात  संगनमताने कामे घेतात का ? असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान सार्वजिक बांधकाम खात्याकडे असलेले नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत पंचायत समितीचे कंपाउंड करून घ्यावे. तसेच इमारतीत येणारे पावसाच्या पाण्यासाठी खिडकीबाहेर पत्र्याचे शेड मारण्यासंदर्भात ठराव घेण्याचे त्यांनी सुचवले.

यावेळी सभापती सौ प्रियांका भोसले यांनी वन विभागाला विचारणा केली कि, वन खाते शेतकऱ्यांना आपल्या जागेत येवू देत नाही. परंतु विद्यार्थी शाळेला जात असतात. तेंव्हा त्यांच्यावर जंगली प्राण्यांचा हल्ला होतो. याला जबाबदार कोण ? त्यामुळे वन खात्याने विद्यार्थ्यांसाठी ये-जा करण्यासाठी वाहनाची जबादारी वन खात्याने घ्यावी. गव्यांचा  हल्ला शित्तूर वारुण परिसरात झाला होता. त्यांचा पंचनामा  झाला का ? अशी विचारणा सुद्धा सौ भोसले यांनी केली.

यावेळी विरोधी गटनेते अभयसिंह चौगुले म्हणाले कि, गोगवे पैकी ठमकेवाडी येथील पाणी योजना केवळ विज कनेक्शन मुळे थांबले आहे. ते त्वरित चालू करावे, कारण  उन्हाळा वाढू लागला आहे. यावेळी शाहुवाडी वीज वितरण चे उपभियांता यांनी सांगितले कि, ग्रामपंचायत गोगवे चे वीज बिल ६ लाख थकीत गेल्याने कनेक्शन थांबविण्यात आले आहे. दरम्यान काही रक्कम भरून घेवून पाणी योजना सुरु करावी, असे आवाहन देखील श्री अभयसिंह चौगुले यांनी केले.

दरम्यान कडवे येथील एका कामाचे बिल पंचायत समिती च्या बांधक्म विभागाने का थांबविले आहे. असे विचारता, बांधकाम विभागाचे उप अभियंता यांनी सांगितले कि, सभापती यांच्या पत्रामुळे त्या कामाची चौकशी लावण्यात आली असून, चौकशी पूर्ण होताच बिल देण्यात येईल. यावर अभयसिंह यांनी अधिकाऱ्यांना विचारले कि, कामाची चौकशी लावण्या अगोदर गुणवत्ता तपासणी केली असताना देखील बिल थांबविणे चुकीचे आहे. यावर उपसभापती अमरसिंह खोत म्हणाले कि, सदर च्या कामाची निविदा १५ टक्केने कमी भरली आहे. तेवढ्या निधीमध्ये काम कसे पूर्ण झाले. याबद्दल शंका आहे. कारण कदाचित ते काम निकृष्ट दर्जाचे झाले असावे, याची शंका आल्याने त्या कामाची चौकशी लावण्यात आली आहे. ती चौकशी पूर्ण होताच ते काम योग्य पद्धतीने झाले असल्यास त्या कामाचे बिल निश्चितच काढण्यात येईल.

यावेळी अभयसिंह यांनी एसटी खात्याकडे मलकापूर-मुंबई संध्याकाळ ची बस सेवा पूर्ववत व्हावी,अशी मागणी केली. बांबवडे  प्राथमिक आरोग्यवर्धिनी संदर्भात विचारले कि, साडेतीन कोटीची इमारत पूर्ण असूनही त्याचे लोकार्पण केवळ ड्रेनेज व्यवस्थेमुळे थांबले आहे. तसेच ४० लाखाचा निधी उपलब्ध असताना आरोग्यवर्धिनी चे फर्निचर अद्याप का आले नाही. याची देखील विचारणा केली.

यावेळी सब स्टेशन बाबत बोलताना, शाहुवाडी वीज वितरण कंपनी चे उप अभियंता श्री कुंभारे म्हणाले कि, शाहुवाडी, मांजरे, शिंपे येथील सब स्टेशन लवकरच सुरु होईल. सोनवडे इथे जागा उपलब्ध न झाल्याने थांबले आहे. जागा मिळताच त्याचे काम देखील लवकरच सुरुवात होईल.

शेतात घर असलेल्या ग्राहकांना देखील कनेक्शन दिले जाईल.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी सांगितले कि, दोन वर्षे शासनाकडून निधी आलेला नसल्याने कामे थांबली आहेत. ठमकेवाडी, धोंडेवाडी इथं ग्रामस्थांचा विरोध झाल्याने काम थांबले. शिंदेवाडी भोसलेवाडी इथे वन विभाग, व ग्रामपंचायत ठराव देत नसल्याने काम थांबले. गजापूर, वाणी पेठ येथील कामे लवकरच पूर्ण होतील.तसेच सावे येथील समाज मंदिर, उखळू पैकी अंबाईवाडा येथील कामे सुरु करण्यात आली आहेत. तसेच ८ कामांसाठी १४ कोटींचा निधी उपलब्ध होत आहे.

उर्वरित पंचायत समिती सभेचा वृत्तांत उद्या प्रसिद्ध करण्यात येईल.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!