विविध मागण्यांसाठी मलकापुरात रास्ता रोको संपन्न : भविष्यात लोकसभेसाठी रणवीरसिंग गायकवाड
मलकापूर प्रतिनिधी : मलकापूर तालुका शाहुवाडी येथील विठ्ठल मंदिर जवळ शासनाकडे विविध मागण्यांसाठी रास्ता रोको केले होते. शासनाच्या अनेक गोष्टींच्या निषेधार्थ माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर, व रणवीरसिंग गायकवाड गटाच्या युतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील तसेच रणवीरसिंग गायकवाड यांच्यासहित अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.

यावेळी शिवसेनेच्या वतीने ओला दुष्काळ जाहीर करा, आनंदाचा शिधा तत्काळ घरपोच करा, मुख्यमंत्री सडक योजनेतील कामे लवकर सुरु करा, वीस पट असलेल्या जिल्हा परिषदांच्या शाळा बंद करू नका, पाणी पुरवठा योजनेची कामे तत्काळ सुरु करा, अशा विविध मागण्यांसाठी राज्य सरकार च्या विरोधात कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर म्हणाले कि, सध्याचे खोके सरकार लबाड सरकार आहे. जनतेचा या सरकार वरील विश्वास उडाला आहे. अनेक विकास कामांना खीळ घालणाऱ्या सरकार ला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. तसेच शाहुवाडी तालुका हा दुर्गम असून, येथील भावी भविष्याचे शैक्षणिक नुकसान करणारा आदेश म्हणजे २० पत असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करणे. हे आम्ही करू देणार नाही. रस्त्यांसह विविध विकास कामे बंद करू नका. सध्या उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात मंजूर झालेली विकास कामे बंद करणे , एककलमी कार्यक्रम या सरकार ने सुरु केला आहे. यामध्ये अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. असेही माजी आमदार सत्यजित पाटील म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस चे युवा नेते रणवीरसिंग गायकवाड म्हणाले कि, शिवसेनेशी गद्दारी करून गेलेल्यांची पर्वा न करता एकनिष्ठ राहिलेल्या सत्यजित पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून येणाऱ्या निवडणुकीत त्यांना प्रचंड मतांनी विजय करायचे आहे. या वेळी उपस्थितांमधून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी चे कार्यकर्ते प्रकाश कांबळे म्हणाले कि, ज्यांनी शिवसेनेची मते घेवून गद्दारी करून, दिल्ली गाठली.
भविष्यात त्यांना या मतदारसंघात स्थान न देता, राष्ट्रवादी चे युवा नेता असलेले रणवीरसिंग गायकवाड यांना लोकसभेवर निवडून पाठवायचे, आणि गद्दारांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे.

तसेच शाहुवाडी पंचायत समितीचे सभापती विजय खोत म्हणाले कि, कोणाच्यातरी सांगण्यावरून तालुक्यातील अधिकारी वर्ग विकास कामांना खो घालीत आहेत. अशा सर्व अधिकाऱ्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे.

आज रोजी झालेल्या रास्ता रोको मुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती हंबीरराव पाटील बापू, विजयराव बोरगे पैलवान, पंडीतराव शेळके, शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा उपप्रमुख नामदेवराव गिरी, महादेवराव पाटील, गणीभाई ताम्हणकर, तालुकाप्रमुख दत्ता पोवार,दिनकर लोहार, योगेश कुलकर्णी, महिला आघाडी प्रमुख अलका भालेकर, पूनम भोसले, व राष्ट्रवादी कॉंग्रेस चे कार्यकर्ते तसेच शिवसेनेचे शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान संबंधित विभागाचे अधिकारी निवेदन स्वीकारण्यास हजार न राहिल्याने मोर्चा आणि कार्यकर्ते काही काळ आक्रमक झाले.

यावेळी शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राधानगारीच्या पोलीस उपनिरीक्षक अनुराधा पाटील यांनी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

दरम्यान विजय बोरगे, दत्ता पोवार, नामदेव गिरी, दिनकर लोहार आदी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.