वैद्य दिलखुष तांबोळी यांना ” भिषक भूषण ” पुरस्कार जाहीर
बांबवडे :बांबवडे तालुका शाहुवाडी येथील कायमचे रहिवाशी व कोल्हापूर येथील कांकायन चिकित्सालय चे संचालक वैद्य दिलखुष मकबूल तांबोळी यांना केरळ येथील वाग्भट सारिणी व हैद्राबाद विद्यापीठाच्या संस्कृत विभागाकडून ” भिषक भूषण ” पुरस्कार जाहीर झाला आहे.

स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ‘ आझादी का सुवर्ण महोत्सव ‘ अंतर्गत देशातील ७५ वैद्यांना या संस्थांनी पुरस्कार जाहीर केला आहे. त्या मंडळींमध्ये श्री तांबोळी यांचा समावेश आहे. गेल्या १५ वर्षात आयुर्वेद प्रचार व प्रसारासाठी केलेल्या कार्याबद्दल वैद्य तांबोळी यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सेमिनार, आयुर्वेद उपचार, शिबिरांचे आयोजन करून त्यांनी आयुर्वेदाचे विद्यार्थी तसेच सामान्य जनतेला आयुर्वेदाचे महत्व पटवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांनी कोल्हापूर येथे चरक सप्ताहाचे आयोजन करून भारतातील ३४ वरिष्ठ वैद्यांची व्याख्याने आयोजित केली होती.

” चरक साप्ताह ” म्हणजे चरक संहितेवर संपूर्ण भारतात आयोजन केलेला पहिला उपक्रम होता. वैद्य तांबोळी यांना यापूर्वीही वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहेत. यापूर्वी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्तेही वैद्य तांबोळी यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.