शाहुवाडी तालुक्यात पावसाचा ” कहर “…
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यात पावसाने कहर केला असून तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून, कोल्हापूर -रत्नागिरी महामार्ग बंद झाला आहे. दरम्यान दुपारी चांदोली धरणातून पाण्याचा २००० ते ४००० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. तालुक्यातील शाली, कडवी, वारणा नदीला पूर आला आहे.





तालुक्यातील येलूर ,जाधववाडी, निळे इथं कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर पाणी आले आहे. यामुळे कोकणाचा कोल्हापूर शी असलेला संपर्क तुटला आहे. तर कधी नव्हे ती बांबवडे बाजारपेठ असलेल्या अंबीरा पुलाने कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग ओलांडला आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याची सध्याची परिस्थिती आहे. दरम्यान सरूड च्या दिशेने पुलाजवळ पाणी आलं आहे. त्यामुळे बांबवडे-सरूड मार्ग बंद झाला आहे. तसेच शित्तूर तर्फ मलकापूर इथल्या पुलावर देखील पाणी आलं आहे. तर बांबवडे -सरूड मार्गावर पेट्रोल पंपासमोर देखील अंबीरा ओढ्याचे पाणी रस्त्यावर आले आहे. दरम्यान चरण-डोणोली मार्ग देखील बंद झाला आहे.



दरम्यान बांबवडे गावाची तहान भागवणारा पाझर तलाव पहिल्यांदाच रस्त्यावर आल्याचे पाहायला मिळाले . उदय साखर कारखान्याच्या रस्त्यावर तलावाचे पाणी उलटू लागले.