शिंपे त वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करा ,अन्यथा उग्र आंदोलन-श्री संपत पाटील
बांबवडे : शिंपे तालुका शाहुवाडी येथील गायरानात असलेल्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. याबाबत ग्रामपंचायत व प्रशासनाने सदर गोष्टींकडे कानाडोळा केला असून संबंधित मंडळींना वाचविण्याचा डाव प्रशासनाचा आहे का ? सदर घटनेबाबत सात दिवसांच्या आत कडक कारवाई करावी. अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.अशी माहिती गावचे युवा सामाजिक कार्यकर्ते श्री संपत आनंदराव पाटील यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.
ते पुढे म्हणाले कि, ग्रामपंचायत शिंपे मधील काही मंडळी व ग्रामसेवक यांच्या संगनमताने हि निसर्गाची कत्तल सुरु आहे. तोडलेल्या झाडांच्या बदल्यात इतर वूक्षरोपण सुद्धा केलेले नाही. त्यामुळे हि बाब अतिशय गंभीर आहे. याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. याचबरोबर वन खाते सुद्धा झोपले आहे का? इतर वेळी गरीब शेतकऱ्यांच्या पारळी वन खाते काढून घेण्यासाठी सुद्धा मागेपुढे पहात नाहीत. मग या गावात शेकडो झाडांची कत्तल होत असताना, दुर्लक्ष का केले जात आहे, कि या झाडांच्या कत्तल साठी वन खात्याचा च पाठींबा आहे. हा सुद्धा प्रश्न इथं उपस्थित होत आहे. दरम्यान गायरान हि महसूल विभागाची आखत्यारी असते. ते फक्त देखभाल दुरुस्ती साठी ग्रामपंचायत च्या ताब्यात असते. मग येथील तलाठ्यांना हि गोष्ट माहित नाही का ?,कि माहित असूनसुद्धा तेरी भी चूप आणि मेरी भी चूप , असा सावळा गोंधळ सुरु आहे. म्हणूनच सदर घटनेची त्वरित चौकशी करून, संबंधित आरोपी मंडळींवर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी सुद्धा संपत पाटील यांनी केली आहे.