शित्तूर तर्फ वारुण ग्रामस्थांची पाण्याची वणवण थांबणार
शित्तूर तर्फ वारुण ( मनीष नांगरे ) : शाहुवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ वारुण येथील क्रांतीनगर मध्ये नळ पाणी पुरवठा योजने अंतर्गत नवीन पाईपलाईन बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. हे काम १५ व्या वित्त आयोगातून करण्यात येत आहे.

शाहुवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील चांदोली धरणापासून शित्तूर तर्फ वारुण हे गाव अवघ्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे, तर वारणा नदी अवघ्या एक किलोमीटर अंतरावरून वाहत आहे. तरी देखील उन्हाळा आला कि , येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असे. कधी वीज पंपात बिघाड तर, कधी लिकेज चा प्रॉब्लेम, हि कारणे येथील लोकांच्या पाचवीलाच पुजलेली असायची. वारणेच्या तीरापासून डोंगरापर्यंत विस्तारलेल्या या गावाला नेहमीच पाणीपुरवठ्याच्या अपयशाला सामोरे जावे लागत होते. परंतु गावात सुरु झालेले पाईप लाईन चे काम म्हणजे विकास कामांचा एक आशेचा किरण मानावयास हरकत नाही. यामुळे ग्रामस्थांच्या एका विकासाला सुरुवात झाली आहे.

यावेळी येथील सरपंच सौ नीता अशोक पाटील यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले कि, सुमारे १ लाख रुपये खर्चाचे हे काम सुमारे ७५० फुट लांबीचे आहे. यामध्ये सुमारे ३०० फुटाचे काम वाढीव होत असून, याचा खर्च ग्रामपंचायत शित्तूर तर्फ वारुण यांच्यावतीने करण्यात येणार असल्याचे ग्रामसेवक पी. एन. पाटील यांनी सांगितले.

या उद्घाटन प्रसंगी गावचे सरपंच यांच्यासहित सदस्य सौ वर्षा झेंडे, मोहन महिंदकर, राजाराम पाटील, सिद्धार्थ कांबळे, अशोक पाटील, तसेच उत्तम पाटील चेअरमन, शिवाजी पवार, सुरेंद्र यटम, बाबाराम यटम, पै.तात्यासो पाटील, सौ. कल्पना पाटील, वसंत पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.