शित्तूर वारुण पैकी कदमवाडी इथं अग्नितांडव : मानवी जीवितहानी नाही,पण पशुधन संपले
शित्तूर तर्फ वारुण (विशेष प्रतिनिधी ) दशरथ खुटाळे : शाहुवाडी तालुक्याच्या उत्तर भागात असलेल्या शित्तूर च्या ग्रामस्थांनी आज अग्नितांडव काय असतं, हे अनुभवलं. या अग्नितांडव मध्ये सुदैवाने मानवी जीवित हांनी झालेली नाही. परंतु स्वत:च्या जिवापलीकडे जपलेले पशुधन मात्र त्यांना गमवावे लागले. या अग्नितांडवामध्ये शेळ्या, गुरे जळून मृत्यूमुखी पडली , तर काही गंभीर जखमी झालीत. यासोबतच चीज वस्तू आणि अवघा संसार आगीच्या भक्ष्यस्थानी पडून खाक झाला. हि दुर्घटना आज दि.३० मार्च रोजी पहाटे घडली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्याच्या उत्तर भागात शित्तूर तर्फ वारुण पैकी कदमवाडी येथील नामदेव कुशाबा कदम यांच्या घराला आज पहाटे पावणे तीन वाजणे च्या दरम्यान अचानक आग लागली. अचानक लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केले. या घरात सात कुटुंबे रहात होती. पहाटे ची वेळ असल्याने अवघी कुटुंबं निद्रेच्या कुशीत होती. कदम यांचे १३ आखणी म्हणजे सुमारे ६५ फुट (अंदाजे ) लांबीचे घर आहे. घराच्या बाजूस जनावरांचा गोठा, तसेच शेळ्यांचा कळप असलेला गोठा सुद्धा तिथेच आहे. या घरात रामचंद्र कुशाबा कदम, भरत रामचंद्र कदम, नामदेव कुशाबा कदम, मारुती नामदेव कदम, आनंदा नामदेव कदम, शंकर नामदेव कदम, राजाराम नामदेव कदम हे सात कुटुंबीय या घरात रहात होते.आगीची भीषणता एवढी होती कि, राऊतवाडी, मगदूमवाडी, पाटीलवाडी येथील ग्रामस्थ या ठिकाणी आग विझवण्यासाठी पोहचली. मिळेल त्या पद्धतीने आग विझवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

या भयंकर आगीच्या भक्ष्यस्थानी अवघे घर पडले . जनावरांना वाचवताना माणसे होरपळून निघालीत. शेळ्यांचा कळप असलेल्या गोठ्यावर पेटते छप्परच कोसळले. त्यामुळे शेळ्या होरपळून मेल्या. कुटुंबाचे संसारोपयोगी साहित्य जळून गेले, तर साठवणीचे धान्य जळून कोळसा झाले.

आग नियंत्रणात येईपर्यंत इथं राहणारी कुटुंबंअगदी विषन्य अवस्थेत गेली. सदर च्या आगीत खुद्द नामदेव कुशाबा कदम हे सुद्धा होरपळून जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान गाय व बैल भाजल्याने गंभीर जखमी झाले आहे.
प्रथमदर्शनी हि आग शॉर्टसर्किट मुळे लागल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
दरम्यान या आगीत कदम कुटुंबाचे सर्वकाही नष्ट झाले आहे. तरी सदरच्या कुटुंबाला दानशूर व्यक्तिमत्वांनी सहकार्य करावे, असे ग्रामस्थांचे आवाहन आहे.