शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित आर्थिक मदत द्यावी – जनसुराज्य शक्ती पक्ष
सोंडोली प्रतिनिधी : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्याचा उत्तर भाग असलेल्या कानसा खोरा, कडवी खोरा, तसेच वारणा खोरा भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांच्या नुकसानिची त्वरित पाहणी करून पंचनामे करावेत, व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशा आशयाचे निवेदन जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीने शाहुवाडी तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

शाहुवाडी उत्तर भागात नेहमीच सर्वाधिक पाऊस पडत असतो. तसेच या भागातून कडवी, वारणा नद्या वहात आहेत. अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर येतो. तसेच भूस्खलन झाल्यामुळे शेतीची माती वाहून जाते. अशाप्रकारे सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे होते.

दरम्यान या भागाकडे अधिकारी वर्गाचे नेहमीच दुर्लक्ष असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे वेळेवर होत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळण्यास उशीर होतो. या सर्व पार्श्वभूमीवर विरळे चे माजी सरपंच कृष्णात पाटील यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देवून शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी, असे आवाहन निवेदनाच्या माध्यमातून केले आहे.

यावेळी चेअरमन बयाजी पाटील, सुरेश सुतार, डे.सरपंच अनिल पाटील उपस्थित होते.