शेती, शेतकरी वाचवण्यासाठी एकमुखी लढा गरजेचा- श्री राजू शेट्टी
बांबवडे : शेती आणि शेतकरी यांना भांडवलदार आणि सरकार पासून वाचवायचे असेल, तर समाजातील सर्वच घटकातून व्यापक लढा उभा करणे, हि काळाची गरज आहे. असे मत प्रतिपादन माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले.
येळाणे तालुका शाहुवाडी येथील संकल्प सिद्धी मंगल कार्यालयात “ शेती आणि शेतकरी वाचवा ” राज्यस्तरीय शेतकरी परिषद संपन्न झाली.


या परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून माजी खासदार राजू शेट्टी बोलत होते.
यावेळी बोलताना श्री शेट्टी पुढे म्हणाले कि, भांडवलदार आणि सरकार यांच्यामध्ये संगनमत असून, दोघे मिळून शक्तीपीठ सारखे प्रकल्प शेतकऱ्याच्या माथी मारून शेती आणि शेतकरी यांना संपवण्याचा सरकार चा डाव आहे. समाजातील सर्वच घटक उद्ध्वस्त करण्यासाठी शेतकरी, कष्टकरी, गरीब मजूर यांच्या नेतृत्वाचा आवाज दाबण्याचे काम सुरु आहे. शक्तीपीठ महामार्गाला धार्मिक वळण देवून शेतकऱ्यांच्या जमिनी लुटण्याचे काम या योजनांच्या माध्यमातून सुरु आहे. यासाठीच प्रस्थापित नेते २०२९ च्या निवडणुकीची तयारी या प्रकल्पांच्या माध्यमातून करीत आहेत. हा प्रकल्प सुमारे ७० हजार कोटींचा आहे. परंतु या माध्यमातून शेतकऱ्यांना संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. असा गंभीर आरोप श्री शेट्टी यांनी केला आहे.
त्यांचा हा डाव आम्ही कधीही यशस्वी होवू देणार नाही. असेही माजी खासदार श्री राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील आबा म्हणाले कि, शेतकऱ्यांच्या हितासाठी या शेतकरी परिषदेला सर्व पक्ष एकत्र आले आहेत. त्यांच्या या परिषदेला शिवसेना ( उबाठा )च्या वतीने जाहीर पाठींबा आहे. असे सांगितले. ते पुढे म्हणाले कि, शेतकऱ्यांचे तसेच सर्व सामान्य घटकांचे प्रश्न घेवून लढणाऱ्या चळवळीला बळ देणे, हि काळाची गरज आहे. शेतकरी वैफल्यग्रस्त होत आहे. शेतकऱ्यांच्या मुलांची वाईट अवस्था असून, समाजात बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे. हि शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे. इथली प्रशासकीय व्यवस्थ दिवसेंदिवस निबार तसेच निर्भीड होवू लागली आहे. यांना कुठेतरी थांबवणे गरजेचे आहे. असेही श्री सत्यजित पाटील यांनी सांगितले.
यावेळी या शेतकरी परिषदेत अनेक ठराव संमत करण्यात आले. यामध्ये शेती आणि शेतकऱ्यांचे दलालांपासून तथा सरकारी लुटीच्या योजनांपासून संरक्षण करणे, जंगली जनावरांचा वन खात्याने बंदोबस्त करावा, जंगल कटाई थांबवा, केमिकल प्रकल्प, सौर उर्जा प्रकल्प, गॅस प्लांट थांबवा, रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली दलालांचे पोषण आणि शेतकऱ्यांचे मरण थांबवा, आयात- निर्यात मधील दलाली मुळे होणारी शेतकऱ्यांची लुट थांबवा, परकीय मालापासून शेतमालाचे संरक्षण करा, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट भाव मिळावा, शेती वाचवा, शेतकरी वाचवा, असे महत्वाचे ठराव या परिषद मध्ये करण्यात आले आहेत.
या शेतकरी परिषद मध्ये मुख्य संयोजक कॉम्रेड अतुल दिघे, भाई भारत पाटील, शेतकरी नेते अशोक जाधव देवरुख, किशोर ढमाले उत्तर महाराष्ट्र, श्रमिक शेतकरी संघटनेचे मराठवाडा सचिव उद्धव शिंदे, माजी आमदार संपतराव पवार-पाटील आदी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केलीत.
यावेळी भैय्या थोरात, सुरेश म्हाऊटकर, राजाराम मगदूम, राजेंद्र देशमाने, सुरेश घोलप, शामराव पाटील, मुकुंद पाटील, शिवाजी शेळके, जयसिंग पाटील, रामभाऊ शेवाळे, तानाजी चव्हाण, रामचंद्र पाटील, पद्मसिंह पाटील, नाना पाटील, शामराव भोसले, भीमराव पाटील, भिवा तळेकर, विजय पाटील, अवधूत जानकर, यांच्यासह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
