सह्याद्री च्या काळ्या छातीवरील पांढरी रेघ : स्व.संजय दादा : संजय दादांना विनम्र आदरांजली.
बांबवडे :स्व. आमदार संजयसिंह गायकवाड दादा यांच्या २६ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली आणि विनम्र अभिवादन.
स्व. संजय दादांना आपल्यातून जावून आज २६ वर्षे पूर्ण होत आहेत. या कालावधीत पुलाखालून खूप पाणी गेले आहे. अनेक उलथापालथ झाली आहे. तरीही दादांवर प्रेम करणारा एक वर्ग आजही आशा धरून आहे. भले ते दिवास्वप्न ठरेना. एक काळ होता, जेंव्हा दादा येणार आहेत, असे कळताच उदय नागरी पतसंस्थेत लोकांची गर्दी उसळायाची. काम असो वा, नसो. त्यांचे दर्शन हीच प्रत्येकाच्या आत्म्याची तृप्ती असायची. दादांनी एकदा तरी माझ्याकडे पहावं, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा असायची. आणि दादा आल्यानंतर ती अपेक्षा पूर्ण व्हायचीच. असा तो काळ होता.
आज तो काळ बदलेला पहायला मिळत आहे. आपला नेता आपल्याला कधी हाक मारतो, याची वाट पाहणारा कार्यकर्ता आज मात्र हवालदिल झाल्यासारखा वाटत आहे.आज त्याला नेत्याने हाक मारण्याची गरज आहे. परंतु दुर्दैवाने हे होताना दिसत नाही. त्या काळात कार्यकर्ता जरी चुकला तरी, दादांनी त्याला एकदा सांगितले, कि तो कार्यकर्ता जीव गेला तरी बेहत्तर, पण दादांचा शब्द ओलांडायचा नाही. कारण त्याच्यावर तेवढ्याच मोलाचं प्रेम दादांनी केले होते. आजची परिस्थिती वेगळी आहे. दादांची जागा कर्णसिंह सरकार यांनी घेतली. राजकारणात अनेक टप्पे टोणपे सोसलेला हा युवा नेता आहे. त्यामुळे जे दादांनी केले, ते आज पाहायला मिळत नाही, कारण काळ बदलला आहे. परिस्थिती वेगळी आहे. कर्णसिंह बाळ तसे प्रयत्न देखील करीत आहेत. जुने कार्यकर्ते जपण्याचा प्रयत्न सुद्धा करीत आहेत. त्यामुळे मूळ प्रेम करणारा, आपलं सर्वस्व वाहून नेत्यासाठी काम कारणारा, कार्यकर्ता सरकारांच्या जवळ जाण्याच्या स्पर्धेत आपोआपच रांगेत उभा आहे. असो. तो दादांचा काळ होता. आज चा काळ बदलला आहे. असे असले तरीही, आजसुद्धा ते लोकांच्या प्रेमाचे वैभव आपण पुन्हा उभे करू शकतो. यासाठी आपली वागण्याची आणि लोकांच्या जवळ जाण्याची पद्धत आपण बदलली पाहिजे. जुन्या आणि नव्या कार्यकर्त्याला तितक्याच मायेने जवळ करणे गरजेचे आहे. यामुळे संजय दादा हे नाव पुन्हा उदयास आल्याशिवाय राहणार नाही. हि सह्याद्रीच्या काळ्या छातीवरील पांढरी रेघ असेल. पुन्हा एकदा संजय दादा या नावाने गट उदयास आणा. इतरांच्या चिन्हावर निवडणुका लढण्यापेक्षा दादांच्या नावाने नव्या चिन्हावर आपली कार्यकर्त्यांची फळी उभी करा. आणि आपले अस्तित्व जपून ठेवा. दरम्यान दादांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. दादांनी जल क्रांतीतून हरित क्रांती निर्माण केली. त्यामुळे सामान्य शेतकरी स्थिरावला. अद्याप दादांच्या स्वप्नातील एम.आय. डी.सी. , तालुकास्तरीय क्रीडासंकुल होणे बाकी आहे. हि स्वप्ने पूर्ण व्हावीत, अशीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.
असो. आपल्यासारख्या कुशल नेतृत्वाला माझ्यासारख्या पामराने काय सांगावे. कमी अधिक झाले असल्यास मोठ्या मनाने माफ करा. पुनश्च स्व. आम. संजय दादा यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र आदरांजली.
