सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणजे ” कोणाच्या खांद्यावर, कोणाचे ओझे ? ” : मनसे ची विकासाची मागणी
उखळू प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील शेवटचे टोक असलेले उखळू गाव, हे गाव सह्याद्री व्याघ्रप्रकल्प अंतर्गत येत असून, या प्रकल्पाचा सर्वाधिक त्रास उखळू गावाला होत आहे. उखळू गाव हे या प्रकल्पाच्या बफर झोन मध्ये येत आहे. गेल्या दहा वर्षांपासून विकासात्मक काम इथं या प्रकल्पाच्या अनुषंगाने आलेले नाही. हा प्रकल्प सांगली जिल्ह्यात असल्याने याच्या सुविधा सांगली जिल्ह्याला मिळत आहेत.आणि त्रास मात्र कोल्हापूर जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या उखळू गावाला होत आहे. म्हणजेच ” कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे ? ” , अशी परिस्थिती झाली आहे. यासंदर्भात या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी विचार करावा, आणि काही विकासात्मक कामे उखळू गावासाठी व्हावीत. तसेच येथील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून द्यावा, अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष श्री धनाजीराव आगलावे यांच्या हस्ते वन क्षेत्र कार्यालय यांना देण्यात आले.

निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे कि, या व्याघ्र प्रकल्पामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे जंगल क्षेत्र अधिक येत आहे. असे असूनही, या संदर्भातील विकासकामे मात्र सांगली जिल्ह्याकडे जात आहेत. येथील वन्यप्राण्यांचा सर्वाधिक त्रास हा येथील उखळू सारख्या छोट्या गावांना होत असतानाही, याचा फायदा मात्र सांगली जिल्ह्यालाच होत आहे. याबाबत शासनाने विचार करून येथील तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सुद्धा या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

यावेळी मनसे चे महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार चिटणीस श्री विलास वडाम, तालुका उपाध्यक्ष संभाजी आटकेकर, उखळू शाखा अध्यक्ष अंकुश वडाम, उपाध्यक्ष संतोष कोळगे, महाराष्ट्र सैनिक श्री अनिल पाटील,, रामभाऊ सोंडोलीकर, व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.