सोबत चाललेलं आयुष्य… आणि शेवटी एकत्र विसावलेलं प्रेम
बांबवडे : काही नाती गाजत नाहीत, दिसत नाहीत, बोलकी नसतात—

पण ती आयुष्यभर एकमेकांच्या सोबत सावलीसारखी चालत राहतात.बांबवडेतील जयसिंग निकम ऊर्फ साऱ्या गावाचे “आबा” आणि त्यांच्या पत्नी पार्वती निकम यांचं नातंहि असंच होतं,शांत, खोल आणि अखंड.तरुणपणी संसाराची सुरुवात झाली. जबाबदाऱ्यांनी भरलेलं आयुष्य, कमी साधनं, पण भरपूर समाधान. कै.पार्वती निकम या घराची चूल पेटती ठेवत होत्या, तर आबा गावासाठी आणि शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहचवण्याचे काम करत होते. दिवस संपायचा, पण संध्याकाळी दोघांची नजर एकमेकांवर विसावायची—तेवढंच पुरेसं असायचं.
वर्षं सरत गेली. केस पांढरे झाले, चालणं हळू झालं, पण मनातली आपुलकी तशीच राहिली. कै.पार्वती निकम आजारी पडल्या तेव्हा आबा फक्त पती नव्हते तर ते आधार होते, काळजी होते, आणि न बोललेलं प्रेम होते. बायपास शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रत्येक गरज, प्रत्येक इच्छा, आबांनी आपलीच मानली आणि त्या सगळ्या पूर्ण केल्या.त्यांचं प्रेम मोठ्या शब्दांत नव्हतं,ते रोजच्या छोट्या गोष्टींतून दिसायचं.
आबा सिंचन कार्यालयात काम करत होते. शेतकरी, सामान्य माणूस यांच्यासाठी ते कायम उपलब्ध असायचे. म्हणूनच गावाने त्यांना नावाने नव्हे, तर आबा या नात्याने हाक मारली. ते सेवा निवृतीनंतर पण त्यांच्या वयाच्या सवंगड्यासोबतच तरुणवर्गासोबत सुद्धा खेळी मेळीत राहायचे. त्यांना हक्काने सल्ला देऊन वेळप्रसंगी चुकले तर वडीलधाऱ्याच्या नात्याने दम द्यायचे आणि नंतर काळजीही घ्यायचे. त्याचं प्रेम जस समाजावर होत तसच आपल्या पत्नीवर आणि मुलांवर हि होत. म्हणूनच त्यानाही कधी काय कमी पडू दिल नाही.
सहा दिवसांपूर्वी पार्वती निकम याचं निधन झाल. शांतपणे या जगातून त्या निघून गेल्या. त्या क्षणापासून आबांचं घर रिकामं झालं.भिंती होत्या, पण आवाज नव्हता. वेळ होता, पण अर्थ नव्हता.
चार दिवस लोक आले, गेले. नातेवाईक, सहकारी, गावकरी—सगळे जुन्या आठवणी सांगत होते. पण प्रत्येक आठवण आबांना त्या एकटेपणाची अधिकच जाणीव करून देत होती.
जिच्यासोबत आयुष्यभर चाललो,तिच्याशिवाय पुढे कसं जायचं,हा प्रश्न आबांना छळत राहिला.७४ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी कधीहि तक्रार केली नाही.
आणि शेवटी,जसं दोन थकलेले प्रवासी एकाच ठिकाणी विसावा घ्यावा,तसं आबांनीही आपल्या जीवनसाथीच्या मागे जाण्याचा मार्ग निवडला असावा.आणि म्हणूनच पार्वती निकम यांच्या निधनानंतर अवघ्या सहा दिवसांत आबाही कायमचे निघून गेले.पण त्यांनी मागे सोडलेलं नातं,ते आजही जिवंत आहे.हे फक्त दोन व्यक्तींचं निधन नाही,ही वृद्ध वयातील आयुष्यभराच्या सोबतीची,आणि शेवटपर्यंत न सोडलेल्या हातांची कथा आहे.
त्यांच्या पश्चात २ मुले , मुलगी आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचं रक्षाविसार्जन दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी आहे. त्यांच्या दोघांच्याही आत्म्याला शांती मिळो , हीच ईश्वर चरणी प्रार्थना. सा.शाहुवाडी टाईम्स आणि एस.पी.एस.च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
