राजकीयसामाजिक

स्व.उदयसिंगराव गायकवाड साहेब यांना विनम्र अभिवादन :९२ वी जयंती संपन्न


बांबवडे : कोल्हापूर जिल्ह्याचे मानबिंदू ठरलेले आणि शाहुवाडी तालुक्यातील सह्याद्रीचा नामोल्लेख ठरलेले माजी खासदार स्व उदयसिंगराव गायकवाड साहेब यांची ९२ वी जयंती बांबवडे तालुका शाहुवाडी येथील उदय साखर कार्यस्थळावर उत्साहात संपन्न झाली. त्यांच्या या जयंती निमित्त त्यांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने विनम्र अभिवादन.


एकेकाळी जिल्ह्याला देशाच्या नकाशावर मानाने नेवून ठेवण्याची जबाबदारी ज्या व्यक्तिमत्वाने लीलया पेलली, असे ते म्हणजे स्व.माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड साहेब होत. आजही तालुक्यात तसेच जिल्ह्यात त्यांचे नाव अदबीने घेतले जाते.


कोल्हापूर च्या समाजकारणात विकासाची मोहोर उठविताना, त्यांचे नाव मानाने घेतले जाते. कोल्हापूर विमानतळ उभारणीत त्यांचा मोठा वाटा आहे. तसेच सध्याचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस म्हणजेच कोल्हापूर रेल्वे स्टेशन उभारणीत देखित त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.


राजकारणात वावरताना कॉंग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा स्व.इंदिरा गांधी यांचे विश्वासू म्हणून राजकीय वर्तुळात त्यांचे नाव मोठ्या मानाने घेतले जायचे. तालुक्याच्या राजकारणानंतर जिल्ह्याच्या राजकारणात,व त्यानंतर देशाच्या राजकारणात त्यांनी मानाचा ठसा उमटविला आहे.


१९७२ च्या दरम्यान पडलेल्या दुष्काळात तालुक्यात जे पाझर तलाव निर्माण झाले, त्यामध्ये साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणूनच तालुक्यात भगीरथाची गंगा अवतरली. आज बांबवडे बाजारपेठ ला जि सोन्याची किमत आली आहे, त्याला स्व.गायकवाड साहेब यांचाच मोलाचा वाटा आहे. कारण इथं झालेल्या पाझर तलावामुळे लोकांना पिण्यासाठी पाण्याची कायमची सोय झाली. म्हणूनच इथं नोकरीनिमित्त आलेली अनेक मंडळी इथली कायमची रहिवासी झाली.


उद्योगमंत्री असताना सुद्धा साहेबांनी अनेक तरुणांना नोकरी देवून तालुक्यातील अनेक जणांच्या घरात समृद्धी आणण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. तालुक्यातील एकमेव असलेल्या साखर कारखान्याच्या मंजुरीसाठी सुद्धा त्यांच्या शब्दाची गरज भासलीच होती. त्यानंतर कारखान्याची उभारणी झाली. या कारखान्याच्या उभारणी नंतर सर्वसामान्यांच्या खिशात खऱ्या अर्थाने चार पैसे खुळखुळू लागले , हे कोणाला विसरता येणार नाही.


दरम्यान त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी येथील अनेक सुशिक्षित तरुणाना राजकारणाच्या राजमार्गावर आणले. त्यामध्ये माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर, स्व. आनंदराव पाटील, स्व.आमदार संजयसिंह गायकवाड, महादेवराव पाटील साळशीकर,अशी अनेक नावे घेता येतील.


असो. स्व. उदयसिंगराव गायकवाड साहेब म्हणजे शाहुवाडी तालुक्याच्या कोंदणातील कोहिनूर हिरा म्हटल्यास वावगे ठरू नये. आज त्यांची जागा चालविण्यासाठी त्यांचे नातू रणवीरसिंग गायकवाड हे तरुणाईतील सक्षम नेतृत्व पुढे येत आहे. समाजकारणाचा ध्यास आणि राजकारणाची कास यांची सांगड घालत, हे व्यक्तिमत्व सध्या राजकीय पटलावर पुढे येत आहे. सध्या त्यांचा अभ्यास आणि त्यांनी केलेली समाजकारणात नैतिकतेची पेरणी निश्चितच भविष्यात खासदारकीच्या माध्यमातून उगवून येणार आहे. गेल्या पाच वर्षात लोकसभेच्या नेतृत्वाकडून टाकलेली पावले, हि सामान्य जनतेला रुचलेली नाहीत. एक तरुण नेतृत्व म्हणू हा लोकसभा मतदारसंघ नव्या नेतृत्वाच्या शोधात होता. त्या अनुषंगाने जनतेने कौल देखील दिला. परंतु शाहुवाडी ,पन्हाळा आणि शिराळा किमान हे तालुके स्वाभिमानाच्या आणि इमानाच्या बाबतीत कधीच तडजोड करीत नाहीत. सध्या जनता गप्प आहे, कारण योग्य वेळेची, हि मंडळी वाट पहात आहेत. याच दरम्यान रणवीरसिंग गायकवाड हे लोकसभा मतदारसंघासाठी आपले दौरे करीत आहेत. आपले काम प्रसिद्धीच्या झोतात येणार नाही, याचीही ते दक्षता घेत आहेत. परंतु त्यांच्या वाटचालीवरून लोकसभा मतदारसंघाला तरुणाई तील नवे पर्याय म्हणून रणवीरसिंग आपला मार्ग चोखाळीत आहेत. त्यांच्या पाठीशी त्यांच्या आजोबांची म्हणजेच स्व . उदयसिंगराव गायकवाड साहेब यांची पुण्याई आणि बाळकडू, त्यांना, त्यांच्या राजकीय वाटचालीत एक शिदोरी म्हणून मिळणार आहे. असो.


पुनश्च स्व. उदयसिंगराव गायकवाड साहेब यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!