सामान्य कुटुंबाचे दिवास्वप्न सत्यात उतरले….
पैजारवाडी प्रतिनिधी :-
जिद्द,चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर पन्हाळा तालुक्यातील जेऊर , येथील रवींद्र दिलीप रणभिसे यांनी राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या, पी.एस.आय. परीक्षेत यश संपादन करून खाकी वर्दी परिधान करण्याचे स्वप्न साकार केले.
रवींद्रच्या या यशाचे कैतुक करत ग्रामस्थांनी भव्य सत्कार करून गावांतून वाजत गाजत मिरवणूक काढली.
वडील दिलीप रणभिसे यांनी हमाली करत व आईने मोलमजुरी करून आपला कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवला होता .
कुटूंबाचे अन्य कोणतेही उत्पनाचे साधन नसताना, आई वडिलांनी मुलांना संगोपनाबरोबरच उच्चशिक्षण देण्याची जिद्द मनी बाळगली होती. त्यानुसार एक मुलगा उच्चशिक्षित होऊन, गतवर्षी महसूल खात्यातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेतुन गावाचा पोलीस पाटील झाला.
आणि आता दुसरा मुलगा रवींद्र पी.एस.आय. झाल्यावर, आई वडिलांना आकाश ठेंगणे झाले. आनंदाने ऊर भरून आला. पोटाला चिमटा घेत मुलांना शिक्षण दिल्याचे, आज सार्थक झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसुन येत होते.
रवींद्रने विद्यामंदिर जेऊर येथे प्राथमिक शिक्षण घेऊन, छत्रपती शिवाजी हायस्कुल जेऊर, येथे माध्यमिक शिक्षण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पूर्ण केले. पुढे शहरात महाविद्यालयिन शिक्षणासाठी छोट्या मोठ्या नोकऱ्या करत शासकीय सेवेत करियर करण्याचे स्वप्न उराशी बाळगले. जिद्दीने तीन वर्षे सातत्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला, घरची परिस्थिती गरिबीची असल्याने कुटूंबाला आर्थिक हातभार लावत, आत्मविश्वासाने पी.एस.आय. होण्याचे स्वप्न रवींद्रने सत्यात उतरवले. रवींद्रने मिळवलेल्या या यशाने जेऊर गावात फटाक्याची आतिषबाजीसह भव्य स्वागत मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला. यांच्या यशाला सर्व ग्रामस्थानी रवींद्र व त्याच्या कुटूंबावर कैतुकाचा वर्षाव केला आहे.