सभासद, शेतकरी व कर्मचार्यांच्या विश्वासावर आजवर ‘विश्वास’ : आम.नाईक
शिराळा (प्रतिनिधी) : शेतकरी व कर्मचारी, हा साखर कारखानदारीतील महत्वाचा घटक आहे, तो समाधानी ठेवण्याचे काम आम्ही जाणीवपूर्वक केले आहे, असे प्रतिपादन माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
चिखली (ता शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना स्थळावरील चिंतन मंडपात निवृत्त कर्मचारी झालेल्या , ग्रामपंचायत सरपंच व सदस्य झालेले कर्मचारी व बारावी परीक्षेतील गुणवंत कर्मचार्यांच्या मुलांचा सत्कार, अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे प्रमुख उपस्थित होते.
माजी आमदार नाईक म्हणाले, सभासद, शेतकरी व कर्मचार्यांच्या विश्वासावर आजवर ‘विश्वास’ने वाटचाल केली आहे. या तीन घटकाने विश्वास ठेवल्यामुळेच संचालक मंडळाने प्रगतीच्या दृष्टीने निर्णय घेवून सातत्याने प्रगती साधली आहे.
‘विश्वास’ चे नाव आज महाराष्ट्रात सन्मानाने घेतले जात आहे. शेतकर्यांनी पिकवलेल्या उसाला योग्य दर, कर्मचार्यांना वेळच्यावेळी पगार, पगारवाढ, बोनस, कायम सेवेत सामावून घेणे, विमा योजना, कामगार कल्याण मार्फत विविध योजनांचा लाभ देण्याचे काम केले जात आहे. शेतकर्यांना पतीवर, बियाणे, खते, औषधे, ठिबक सिंचन अनुदान, शेतकरी मेळावे, प्रशिक्षण, माती व पाणी परिक्षण आदी सेवा दिल्या जात आहेत. सर्वसामान्य, शेतकरी व कष्टकरी समृद्ध बनला पाहिजे, हा उद्देश ठेवून आजवर वाटचाल केली आहे.
ते म्हणाले, साखरेच्या सातत्याने कमी होणार्या किंमतीमुळे सहकारी साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. साखर निर्यात धोरण जाहिर करताना, केंद्र सरकारने साखरेपक्षा इथेनॉल निर्मिती करणार्या कारखान्यांनाच फायदा दिला आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांना दिलासा मिळालेला नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करत असताना, कारखान्याची आर्थिक शिस्त बिघडणार नाही, याची काळजी आम्ही घेत आहोत. भविष्यातही साखर कारखानदारीबाबत केंद्र सरकारचे असेच धोरण राहीले, तर कारखाने, त्यावर अवलंबून असणारे शेतकरी, कर्मचारी व इतर घटकांपुढे अडचणी उभारणार आहेत. शेतकर्यांनी पिकवलेल्या उसाला जास्तीत जास्त दर देता यावा, अशा पद्धतीचे धोरण केंद्र सरकारने अवलंबून कारखान्यांना मदत करण्याची गरज आहे.
प्रारंभी कामगार संचालक दत्तात्रय पाटील यांनी स्वागत केले. विश्वास साखर कामगार संघटनेमार्फत मान्यवरांचा सत्कार झाला. माजी आमदार नाईक यांच्या हस्ते निवृत्त कर्मचारी, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य झालेले कर्मचारी व बारावी परीक्षेतील गुणवंत कर्मचार्यांच्या मुलांचा सत्कार झाला. विश्वास सेवकांच्या पतसंस्थेवर नियुक्त झालेले नूतन संचालक शंकर पाटील व संजय पाटील यांचाही सत्कार माजी आमदार नाईक यांच्या हस्ते झाला. निवृत्त गेस्ट हाऊस इनचार्ज अशोक कुरणे यांचे मनोगत झाले. या वेळी कार्यकारी संचालक राम पाटील, डॉ. दिनकर झाडे, कामगार संघटनेचे अध्यक्ष टी. एम. साळुंखे, उपाध्यक्ष विजय पाटील, सचिव विजयराव देशमुख, प्रशासकीय अधिकारी ए. एन. पाटील, सर्व खातेप्रमुख, विभाग प्रमुख, कर्मचारी आदी उपस्थित होते. महेंद्र पाटील यांनी आभार मानले.