बांबवडे-बोरपाडळे महामार्गाचे नूतनीकरण न झाल्यास आंदोलन : प्रवाशी संतप्त
बोरपाडळे वार्ताहर :- कृष्णात हिरवे
कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावरील पैजारवाडी ते बांबवडे दरम्यांन असणाऱ्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळणं झाली आहे. त्यामुळे प्रवाश्यांना खड्यातून मार्ग शोधावा लागत आहे. हे खड्डे प्रवाशांना धोकादायक ठरत असून, अपघाताला आमंत्रण देणारे आहेत. त्यामुळे रस्त्यातील खड्डे भरून त्वरित रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक प्रवासी व अवजड
वाहतूकदारांकडून होत आहे.
कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावर कोकण पर्यटक, स्थानिक प्रवासी व अवजड वहानांची मोठी वर्दळ असून, गेली अनेक दिवसांपासून या रस्त्याची संबंधित खात्याकडून देखभाल दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे पैजारवाडी ते बांबवडे दरम्यांन असणाऱ्या सुमारे सात किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. अशातच पावसामुळॆ आणि मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांच्या वाढलेल्या वर्दळीमुळे रस्ता पूर्णपणे उचकटून जुना रस्ता उघडा पडल्याने, मोठं मोठे खड्डे पडले आहेत. संबंधित खात्याकडून या रस्त्यावरील खड्याकडे दुर्लक्ष केल्याने, सध्याच्या खड्यामध्ये वाढ होत आहे. त्याचबरोबर खड्याचीं खोली व आकार मोठे होऊन, या रस्त्याची अवस्था एखाद्या चाळणीसारखी झाली आहे. तसेच खड्यामध्ये पावसाचे पाणी साचून रहात असल्याने खड्याचा वाहन चालकांना अंदाज येत नाही. परिणामी वाहन चालकांचा वाहनावरील ताबा सुटून छोटे – मोठे अपघात होत आहेत. अशा अपघातांमध्ये कित्येक प्रवाशी गंभीररित्या जखमी झाले असून, प्रवाशांना हा रस्ता प्रवासासाठी सुरक्षित नाही. या खराब रस्त्यामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ होत असून, वाहनाचे मोठे नुकसान होत आहे.
अशाप्रकारे या महामार्गावरील रस्त्याची दयनीय अवस्था होऊनही संबंधितांनी रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने स्थानिक प्रवाशांसह अवजड वाहनधाराकांडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या रस्त्यावरील खड्डे भरून त्वरित रस्ता नव्याने डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी होतअसून या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती न झाल्यास महामार्गावर रास्ता रोको सारखे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा संतप्त प्रवाशी, वाहनधारक व नागरिकांनी दिला आहे.