आमचा ‘सागर’ ‘सरपंच’ झाला
बांबवडे : शिका ,संघटीत व्हा, व संघर्ष करा, या वाक्याला अनुसरून बांबवडे येथील श्री सागर सदाशिव कांबळे यांची जनतेतून निवड झाली,आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली लोकशाही खऱ्या अर्थाने अवतरली. आज बांबवडे तालुका शाहुवाडी इथं सरपंच पदासाठी उभे असलेले उमेदवार सागर सदाशिव कांबळे यांना लोकांनी निवडून दिले.
सागर कांबळे ,तसं पाहता हा तरुण केवळ एका तरुण मंडळाचा सभासद होता. त्यांना कोणताही राजकीय वारसा नव्हता, कोणतेही पाठबळ नव्हते. परंतु या तरुणाकडे गुण होते, ते म्हणजे शिक्षण, संघटन कौशल्य,आणि समालोचन व सूत्रसंचालन . या गुणांवर सागर यांनी आपला जीवन प्रवास सुरु केला होता. बांबवडे नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून नोकरी मिळाली. त्यांच्याकडे असलेला प्रामाणिकपणा,कर्तुत्व या गुणांची पारख संस्थेचे सर्वेसर्वा श्री बाळासाहेब खुटाळे यांनी केली, आणि सागर यांना नोकरी मिळाली. कर्तुत्व आणि कौशल्याला पारखण्याची जागा मिळाली. परंतु हि, व्यक्ती राजकारणात कधी उतरेल, असे त्यांनाही कधी वाटले नसावे. एकीकडे नृत्य दिग्दर्शक अशी ख्याती होण्याच्या मार्गावर असताना, मिळालेली नोकरी आणि राजकीय प्रवेश हे सर्व सागर यांच्यासाठी धुक्यातून निघालेल्या मार्गासारखे वाटत असावे. त्यांच्याकडे असलेले सूत्रसंचलनाचे गुण आणि समाजाशी असलेला संपर्क, व त्यांच्यासोबत असलेला सगळ्यात दुर्मिळ गुण म्हणजे संयम ,हे हेरून बांबवडे ग्रामविकास पॅनेल चे प्रमुख व माजी सरपंच विष्णू यादव व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा चेहरा ‘ सरपंच ‘ पदासाठी निवडला.
निवडणुकीचा प्रचार सुरु झाला,आणि पाहता ,पाहता सागर सदाशिव कांबळे यांनी प्रचाराचा चढता आलेख आक्रमित, यशाची गुढी उभारलीच . एकेकाळी अगदी गरिबीच्या दिवसात आपले कुटुंब सांभाळलेले सागर आणि त्यांचे बंधू यांनी निश्चितच हे दिवास्वप्नं सत्यात उतरवले. याला श्रेय द्यायचेच झाले तर माजी सरपंच विष्णू यादव आणि सहकारी मंडळी यांना द्यावे लागेल. अगदी कडव्या झुंजीतून राजकारणाच्या डावपेचातून ‘सरपंच’ पदाचा विजय त्यांनी साकार केला. इथं दुःख एकाच गोष्टीचं वाटतं ,ते हि कि, हे पाहायला त्यांचे गुरु नृत्य दिग्दर्शक स्व. विजय माने असायला हवे होते. तसेच त्यांचे वडील सदाशिव कांबळे यांनी देखील आपले कुटुंब खडतर काळात सांभाळले, आणि आपल्या मुलांना शिक्षण दिले. ते देखील आता हयात नाहीत. असो, काळ हा सगळ्या दु:खावरचे औषध असते. एकीकडे प्रचाराचा धुरळा उडत होता, प्रत्येक पॅनेल आपल्या उमेदवारांचा प्रचार करीत होते ,पण सागर हे नाव मात्र सगळ्यांनीच स्वीकारले होते, म्हणूनच जनतेने हे नांव स्वीकारलं ,आणि आदर्श मित्र मंडळाचा, आमचा ‘सागर’ ‘सरपंच’ झाला.