शिराळा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची चौकशी करताना आमदार शिवाजीराव नाईक
शिराळा प्रतिनिधी : कापरी गावच्या जनतेला भविष्यात लवकरच शुद्ध व पुरेसे पाणी मिळावे, आणि पिण्याच्या पाण्याच्या विहिरीचा व पाणी टाकीचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी, निधी उपलब्ध करून देणार असल्याचे, ठोस आश्वासन आमदार शिवाजीराव नाईक यांनी दिले.
कापरी ता. शिराळा येथे गेली ४-५ दिवसापासून साथीच्या रोगाची लागण झाल्याने, काही रुग्ण ग्रामीण रुग्णालय शिराळा येथे औषधोपचार घेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी गावात जावून ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी नाईक म्हणाले, कापरी गावच्या जनतेला भविष्यात शुद्ध व पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, पिण्याच्या पाण्याच्या विहिरीचा व पाणी टाकीचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी, ग्रामपंचायतीने योग्य तो प्रस्ताव तयार करून, संबधित विभागाकडे पाठवावा. निधी मिळणेकामी शासनस्तरावर योग्य तो पाठपुरावा करू. सध्या गावात साथीच्या रोगाची लागण चालू आहे. ही लागण पाण्यातून झाली असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे पाणी पुरवठा करणारे स्त्रोत ग्रामस्थांनी तपासून घ्यावेत. पाईपलाईनला गळती असल्यास किंवा जमिनी अंतर्गत लिकेज असल्यास ते दुरुस्त करून घ्यावेत. याबात योग्य ती खबरदारी येथील लोकांनी घ्यावी. गावात मांगले प्राथमिक आरोग्य केंद्राचे दक्षता पथक आहे, त्यातून देखील उपचार घ्यावेत.
यावेळी रणजितसिंह नाईक, सरपंच मोहन पाटील, सदस्य राजाराम कांबळे, माजी उपसरपंच मच्छिंद्र पाटील, सोसायटी अध्यक्ष अशोक पाटील, प्रशांत पाटील, संभाजी शिंदे, जालिंदर जाधव, नामदेव पाटील, जयसिंग पाटील, मानसिंग जाधव, आनंदा जमदाडे, प्रदीप कदम या मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते.