सामाजिक

” असा कसा घात पहा, नियतीने केला, समाजकारणात बागडणारा ” राजहंस ” आज पराधीन झाला…”


बांबवडे : संस्कारांच्या कुशीत आणि शिक्षणाच्या मुशीतून तावून, सुलाखून निघालेला एक ” राजहंस ” म्हणजे सागर काशिनाथ झंजाड होय. या व्यक्तिमत्वाला राजहंस संबोधण्याचं कारण म्हणजे स्वत: वेदनेच्या अग्नीत होरपळत असतानाहि, इतरांना मदत करण्याचा त्यांचा पिंड निश्चितच वाखाणण्यासारखा होता. परंतु या व्यक्तिमत्वाला नियतीने मात्र वेळ दिला नाही. ऐन तारुण्यात या व्यक्तिमत्वाने जगाचा निरोप घेतला.
“असा कसा घात पहा, नियतीने केला, समाजकारणात बागडणारा ” राजहंस ” आज पराधीन झाला. “
साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स , एसपीएस न्यूज आणि परिवार, मंजिरी मुकुंद पवार आणि परिवार यांच्यावतीने साश्रुपूर्ण शब्द सुमनांजली.
सागर काशिनाथ झंजाड एक एम.बी.ए. झालेला तरुण. आपल्या आयुष्यात चांगले जिवन जगत होता. आपण जगताना इतरांना सुद्धा चांगलं जिवन जगता यायला पाहिजे, अशा विचारांचा हा तरुण होता. स्वत:चं चष्म्याचं दुकान होतं. यातूनही आपण कुणाला मदत करू शकतो का ? या प्रश्नाने भारून गेलेल्या या तरुणाने, अनेक वृद्धांना आपल्या चष्म्याच्या माध्यमातून ‘ नवी दृष्टी ‘ देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. सध्याच्या जगात स्वत:ची मुले आपल्या आईवडिलांना चष्मा लागला कि, शिबिरात नेवून मोफत, अथवा नगण्य किमतीत चष्मा कसा मिळेल, याकडे पाहतात. परंतु या तरुणाने मात्र स्वकष्टाच्या कमाईतील काही भाग समाजासाठी खर्च करायचा, असं ठरवून अनेक वृद्धांना चष्मा मोफत करून दिला. या गोष्टी सांगण्यासारख्या नाहीत, परंतु यातून त्यांना लाभलेली ‘ सामाजिक दृष्टी ‘ हि सर्व समाजाला लाभावी अशी अपेक्षा आहे.
आपल्या आई वडिलांवर प्रेम करताना अवघं आभाळ भरून जाईल, असं प्रेम त्यांचं आपल्या कुटुंबावर होतं. पत्नी भाऊ, वहिनी पुतणी यांवर अलोट प्रेम करणारं व्यक्तिमत्वं नेहमीच हसत मुख असल्याने, ती मूर्ती मात्र आज डोळ्यांसमोरून बाजूला होत नाही. अनेक लढाया लीलया जिंकताना, लुटुपुटू च्या लढाईत मात्र या वाघानं हार मानली. जग सोडून जातानाही , मी गेल्यावर तुम्ही रडू नका, कारण तुमच्या डोळ्यातील अश्रूंच्या महापुरात मी हरवून जाईल, असे आपल्या आईला सांगताना, त्यांना त्यांचा मृत्यू दिसला होता का ? असाच प्रश्न निर्माण होतो. अशावेळी त्या मातृत्वांला वात्संल्याचा महापूर आला असेल.
केवळ स्वत:चं कुटुंबच नव्हे, तर दादा-वहिनी, काका काकी, आत्त्या-मामा , मावशी, भाऊ , बहिण , पुतणी, अशी अनेक नाती या व्यक्तिमत्वाने स्वत:च्या हृदयाच्या कुपीत हळुवारपणे जोपासली होती. प्रत्येक नात्याला योग्य न्याय देण्याचा त्यांनी यथोचीत प्रयत्न केला. परंतु हे हसतं- खेळतं जीवन अवेळी संपुष्टात आलं. हे दु:ख त्यांच्या आई- वडिलांनी कसं पेलावं ? ते हि अश्रू न ढाळता ? कारण आपल्याच मुलाला त्रास होईल, त्याच्या म्हणण्यानुसार. अनेक गुंते आयुष्यात आम्ही पाहिले आहेत. परंतु नियतीने पुढ्यात आणलेला हा गुंता मात्र निराळाच आहे. मृत्यू ला हि सहजपणे आव्हान देणारं व्यक्तिमत्वं कधी फारसं कुणाला उमजलं नाही. कोणतंही समाजकारण करताना, त्याची प्रसिद्धी होणार नाही, याचीदेखील त्यांनी यथोचित काळजी घेतली.
आज सागर आपल्यात नाही. हे सत्य पचवताना वात्सल्याला महापूर आला असेल, वडिलांची छाती हिमालयासारखी जरी असली, तरी त्यातून अश्रूंच्या अनेक नद्या वाहू लागल्या असतील. पाठीवर असलेला भाऊ आज अर्ध्यात निघून गेला, हे सत्य पचवताना भावासारखा सह्याद्री सुद्धा हळहळला असेल. या दु:खाला मोजमाप नाही. “मामा काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. ” हे सत्य पचवताना भाच्याच्या, मामाला त्सुनामी आल्यासारखे वाटत आहे.
सागर च्या अनेक आठवणी आज हृदयाच्या कप्प्यातून डोकावत आहेत. त्याने साधलेले संवाद आजही तेवढ्याच मोलाचे आहेत. पण त्या मोलाचा अनमोल सागर मात्र आमच्यातून हरवला आहे.
” अनेक हृदयांच्या अंतरीचा नाद आज निनादला , तुझ्या केवळ नसण्याने ‘ सागरा ‘ प्राण तळमळला… “

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!