” घासलं कि जमतं ” नाम. जयंतराव पाटील यांचा कानमंत्र : राष्ट्रवादी परिसंवाद संपन्न
बांबवडे : राजकारणात केवळ नेमणुका करून भागात नाहीत. तर माणसे खऱ्या अर्थाने जोडावी लागतात. एकप्रकारचे माणुसकीचे सैन्य तयार करावे लागते. तरच राजकारणात टिकता येतं. आपल्या प्रभागात जि काही कामे आहेत. ती पूर्ण करावी लागतात. एकंदरीत काय , तर घासलं कि, सगळं होतं. असे मत जलसंपदा मंत्री नाम.जयंतराव पाटील यांनी कार्यकर्त्यांशी परिसंवाद करताना व्यक्त केले.

बांबवडे तालुका शाहुवाडी इथं असलेल्या समर्थ कृपा मंगल कार्यालय इथं राष्ट्रवादी परिवार परिसंवाद कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादीचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील, ग्रामविकासमंत्री नाम. हसन मुश्रीफ , राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड व मान्यवर मंडळी उपस्थित होतीत. तसेच नव्याने राष्ट्रवादीत आलेले योगीराजसिंह गायकवाड यांची देखील यावेळी उपस्थिती होती. तसेच पक्षाचे तालुकाध्यक्ष , विद्यार्थी तालुकाध्यक्ष, बूथ कमिटी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना नाम. जयंतराव पाटील पुढे म्हणाले कि, राजकारणात काम करताना, थोड्या उठ्या-बश्या काढाव्या लागतात. सामान्य माणसांपर्यंत पोहोचावं लागतं. एकदा हे जमलं , कि सीट आली म्हणून समजा. असेही श्री पाटील यांनी यावेळी सांगितले. सहकार आणि राजकारण हि दोन्ही वेगवेगळी क्षेत्र आहेत. त्यांच्या भूमिका वेगवेगळ्या असतात. यावेळी श्री पाटील पुढे म्हणाले कि, गायकवाड घराण्यांचा आणि आमचा जुना घरोबा आहे. स्व. गायकवाड साहेबांनी स्वत: आम्हाला स्व. राजीव गांधींशेजारी बसण्याची संधी मिळवून दिली. दरम्यान साखर कारखान्यांसंदर्भात बोलताना पाटील म्हणाले कि, त्याकाळी संपदा कमिटी होती. ती कमिटी कारखान्यांकडून ६० % साखर विकत घ्यायची व उर्वरित साखर खुल्या बाजारात विक्रीस परवानगी द्यायची,त्यामुळे कारखान्याचे खर्च भाग्याचे.. परंतु ज्यावेळी हि कमिटी बरखास्त झाली, किंबहुना ते अधिकार कमिटी कडून काढून घेतले. तेंव्हापासून अनेक साखर कारखाने आजारी पडू लागले. आणि साखर कारखानदारी अडचणीत आली. परंतु हा तुमचा साखर कारखाना २० वर्षे कराराने जरी दिला असला,तरी भविष्यात दह वर्षानंतर हा कारखाना तुमचे भले केल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच सहकार तुमच्याकडे आहे, राजकारण घट्ट करण्यासाठी जनसंपर्क वाढवा, तुम्हाला विधानसभा निश्चित मिळेल. यावेळी स्व. आम. संजयसिंह गायकवाड यांच्या जनसंपर्काबाबत ची त्यांनी यावेळी उपस्थितांना आठवण करून दिली.

यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यावेळी म्हणाले कि, शाहुवाडी आणि पन्हाळा हे दोन्ही तालुके दुर्गम आहेत, परंतु इथली जनता राष्ट्रवादी पक्षावर प्रेम करणारी आहे. आपल्याला विकास निधी पोहचवण्याचे काम माझे आहे. परंतु तालुक्यातून प्रत्येकी दोन जि.प.सदस्य व आठ पंचायत समिती सदस्य येत्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडून आणावेत. यानंतर विकासकामांचा हिमालय तुमच्या पाठीशी उभा करतो, असे आश्वासन श्री मुश्रीफ यांनी उपस्थितांना दिले. केवळ दोन खासदार असणारा पक्ष देशात सत्ता काबीज करू शकतो, मग आपण का नाही ? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान तालुक्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची कार्यालये उघडून सामान्य जनतेची कामे करावीत. दरम्यान त्या कार्यालयाचे भाडे पक्ष कार्यालय देईल, यातून जनतेची कामे होतील. आणि पक्ष एक नंबर तयार होईल. स्व. आमदार संजयदादांनी ज्याप्रमाणे तालुक्यात काम केले,त्याप्रमाणे काम केले तर पक्ष खऱ्या अर्थाने बळकट होईल. दरम्यान यावेळी स्व. आमदार संजयसिंह गायकवाड यांचे सुपुत्र योगीराजसिंह गायकवाड हे राष्ट्रवादी पक्षाचे काम करीत असून,तेही इथं उपस्थित आहेत, असेही नाम. मुश्रीफ यांनी यांनी यावेळी आवर्जून सांगितले. दरम्यान रणवीरसिंग गायकवाड यांचे या मतदारसंघातील कार्य आणि संघटन पाहता,त्यांना उज्वल भविष्य आहे, असेही नाम. मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

यावेळी कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड यावेळी म्हणाले कि, आमचा मतदारसंघात मानसिंगदादा यांचा जनसंपर्क कायमस्वरूपी आहे. परंतु पक्षाकडून त्यांना पाण्यात पहिले जाते. जर पक्षाने त्यांना विकासनिधी देवून त्यांचे हात बळकट केल्यास पक्षाला आणखी बळकटी आल्याशिवाय राहणार नाही. आणि तालुक्यात राष्ट्रवादी चा झेंडा डौलाने फडकेल, असेही रणवीरसिंग यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य विजयराव बोरगे पैलवान यांनी सांगितले कि, मुश्रीफ साहेबांनी आमच्या मतदारसंघास विकास निधी द्यावा. दरम्यान अनेक विकास कामे आम्ही मतदारसंघात आणली आहेत. सर्वसामान्य जनतेशी संपर्क ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न आम्ही इथं केला आहे. आणि त्या माध्यमातून घराघरात राष्ट्रवादी चा झेंडा पोहचवण्याचे काम आम्ही केले आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष ए. वय. पाटील, तसेच जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील आसुर्लेकर आदींनी आपली मनोगते व्यक्त केलीत.
यावेळी रणवीरसिंग गायकवाड यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.तसेच नाम. जयंतराव पाटील यांच्या हस्ते रणवीरसिंग गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी अखिल भारतीय बौध्द सेवा संघ ( सुरेशराव गायकवाड समर्थक )यांच्यावतीने नाम.जयंतराव पाटील यांचा बुके देवून सत्कार केला. यावेळी महादेवराव पाटील, योगीराजसिंह गायकवाड, जयमाला गायकवाड, विठ्ठलराव पोवार, समीर पाटील, संग्राम खराडे, यांच्यासहित असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार पंडित शेळके सर यांनी मानले.