पूरग्रस्त आक्रोश मोर्चा ची नियोजन बैठक संपन्न
बांबवडे : २३ ऑगस्ट २०२१ रोजी कोल्हापूर इथं होणाऱ्या पूरग्रस्तांच्या आक्रोश मोर्चा चे नियोजन करण्यासाठी वाडीचरण तालुका शाहुवाडी इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक संपन्न झाली.

२३ ऑगस्ट रोजी दु.१२.०० वा. दसरा चौक येथून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निघणार आहे.

या मोर्चा च्या प्रमुख मागण्या अशा असणार आहेत. १. २०१९ च्या धर्तीवर पूरग्रस्त शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी. २. पूरग्रस्तांच्या मागणीप्रमाणे त्यांच्या सोयीनुसार त्यांचे पुनर्वसन व्हावे. ३. कृष्णा व पंचगंगा आदी नद्यांच्या मार्गावर असलेल्या पुलाजवळ चा भराव कमी करून, तातडीने कमानी पूल उभारावा. ४. पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची सरसकट फी माफ करावी, तसेच कर्जमाफी व्हावी. ५. २००५ ते २०२१ या काळात अनेकवेळा महापूर येवून गेले आहेत. या महापुराने अनेक ग्रामस्थांचे संसार उध्वस्त झाले आहेत. यावर कायमस्वरूपी उपाययोजना होण्यासाठी तातडीने अभ्यासगट नेमून, त्यावर त्वरित अंमलबजावणी व्हावी. ६. महापुरामुळे शेतकरी,व्यापारी, उद्योगधंदे आदींचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या विद्यत मोटारी वाहून गेल्या आहेत. विहिरी खचलेल्या आहेत. शेडनेट मोडून पडल्या आहेत. यंत्रमाग धारकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. या सर्वांना सरकार ने तातडीने विनाअट नुकसान भरपाई मिळावी. ७. राज्य सरकारने यापूर्वीच प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान म्हणून जाहीर केले आहे. ती रक्कम तातडीने पूरग्रस्त शेतकऱ्यांना द्यावी. तसेच दोन लाखाहून अधिक थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना वरील रक्कम भरण्यासाठी मुदतीची सवलत देवून, दोन लाखांचे कर्ज माफ व्हावे. ८. महापुराचे पाणी ज्या गावात गेले आहे. त्या संपूर्ण गावाला पूरग्रस्त म्हणून घोषित करून सरसकट सानुग्रह अनुदान देण्यात यावे.

आदी मागण्यांसाठी हा आक्रोश मोर्चा निघणार आहे. यावेळी युवा जिल्हा अध्यक्ष सागर शंभूशेठे, तालुकाध्यक्ष सुरेश म्हाऊटकर, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष वसंत पाटील, रायसिंग पाटील, गुरुनाथ शिंदे, भैय्या थोरात, बळीराम पाटील, रामभाऊ लाड, शिवाजी पाटील, संतोष पाटील, शामराव मिस्त्री, अमर पाटील, अनिल पाटील, दादा पाटील, हरिष पाटील, आणि कार्यकर्ते उपस्थित होते.