पूरस्थिती कडे दुर्लक्ष केल्यास गय नाही – खासदार धैर्यशील माने
शाहुवाडी प्रतिनिधी : अतिवृष्टी आणि महापुरासारख्या गंभीर परिस्थितीत प्रशासन पातळीवर गाफील न राहता, सतर्कता घेवून पूर स्थिती वर लक्ष ठेवा. याकडे दुर्लक्ष झाल्यास कुणाची गय केली जाणार नाही, असा सूचना वजा इशारा खासदार धैर्यशील माने यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला.

शाहुवाडी पंचायत समिती इथं शाहुवाडी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने जो महापूर आला, त्याने येथील नागरिकांचे नुकसान केले आहे. अशा सर्व घटकांना शासन स्तरावर अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. असेही खास. धैर्यशील माने यांनी सांगितले.

शाहुवाडी पंचायत समिती इथं झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील, तहसीलदार गुरु बिराजदार, सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप कोटकर, माजी आरोग्य सभापती हंबीरराव पाटील , पंचायत समिती चे सभापती विजयराव खोत, उपसभापती दिलीप पाटील, शिवसेनेचे गोकुळ चे संचालक मुरलीधर जाधव, जिल्हा उपप्रमुख नामदेव गिरी, तालुका प्रमुख दत्ता पोवार, अमर पाटील व प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी श्री माने पुढे म्हणाले कि, अचानक उद्भवलेल्या या नैसर्गिक आपत्तीने सर्वांच्यासमोर चिंतेचे सावट उभे राहिले आहे. शेती सोबत व्यावसायिकांचे सुद्धा यावेळी नुकसान झाले आहे. ज्याठिकाणी गंभीर परिस्थिती आहे, अशा ठिकाणी संपर्क यंत्रणा गतिमान करा. प्रत्येक नुकसान ग्रस्ताची नोंद घेवून, त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करा. कुणालाही वंचित ठेवू नका. केवळ कागदी घोडे नाचवू नका. शासन स्तरावर सर्वोतोपरी मदत करा. असेही खास. माने यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बांधकाम विभाग,आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, महावितरण चे अधिकारी , तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान अतिवृष्टी मुळे खचलेल्या अंतर्गत रस्त्यांची योग्य माहिती अधिकाऱ्यांना देता न आल्याने, या विभागाची खासदारांनी चांगलीच कानउघाडणी केली. तसेच अधिकारी उपस्थित न राहिल्याने खासदारांनी संताप व्यक्त केला.

प्रारंभी तहसीलदार गुरु बिराजदार यांनी तालुक्यातील पूरस्थिती व झालेली अतिवृष्टी, पूरबाधित नागरिकांचे केलेले स्थलांतर, तसेच सध्याची धोकादायक स्थिती, मोफत धान्य वाटपाबाबत उपलब्ध धान्य, सरासरी एकूण प्राथमिक स्वरुपात झालेल्या नुकसानीची आकडेवारी, एकूण झालेले नुकसान आणि हि उद्भवलेली विदारक स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक बाबी विषद केल्या.
यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील यांनी देखील अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
सभापती विजय खोत यांनी ओढे, नद्यांना पूर आल्याने झालेल्या नुकसानीची माहिती दिली, व शेतीबद्दल विशेष दखल घेण्याची विनंती केली.