बांबवडे पंचायत जवळ दीड फुटाचा खड्डा कधी भरणार ?- जनतेतून मागणी
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील हरिजन वसाहत नजीक, गेले तीन ते चार महिने एक ते दीड फुटाचा खड्डा पडला असून, या खड्ड्यामुळे मोठा अपघात घडू शकतो. परंतु राज्य महामार्ग खाते या खड्ड्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे का ? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. यामुळे वाहनांची वित्तहानी सह जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. लवकरात लवकर जर यावर उपाय झाला नाही, तर ग्रामस्थांकडून उग्र आंदोलन करण्यात येईल, अशी चर्चा ग्रामस्थांतून होत आहे.

बांबवडे ग्रामपंचायत नजीक असलेल्या हरिजन वसाहत नजीक कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावर सुमारे एक ते दीड फुट खोलीचा खड्डा पडला आहे. येथील दुकानदार व्यावसायिक हा खड्डा स्वखर्चाने सातत्याने भरत आहेत. परंतु सतत च्या वर्दळीने तो खड्डा पुन्हा वाढत आहे. याठिकाणी अनेक दुचाकी , तसेच चार चाकी वाहनांचे खड्ड्यात अडकून अपघात झालेले आहेत. परंतु यात कोणतीही जीवितहानी सुदैवाने झालेली नाही. परंतु वाहन चालाकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीस जबाबदार असलेले महामार्ग खाते मात्र या खड्ड्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

यामुळे हा खड्डा जर महामार्ग विभागाने त्वरित न भरल्यास ग्रामस्थांकडून उग्र आंदोलन होण्याची शक्यता आहे.