बाजीराव घोलप यांची पोलीस दलातील निष्कलंक ३७ वर्षे सेवा स्पृहणीय
बांबवडे : शाहुवाडी तालुक्याच्या मातीचा गंधच आगळा. या मातीतच दुर्दम्य इच्छाशक्ती , चिकाटी या गुणांची उपजतच देणगी मिळालेली असते. ह्याच गुणांच्या बळावर इथला कष्टकरी वर्ग मुंबई सारख्या महानगरात जावून स्थिरावतो, आणि किंमत देखील कमावतो. याचेच उदाहरण म्हणजे तालुक्यातील शिवारे येथील बाजीराव शिवराम घोलप . काल दि.१ डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस होता. आणि त्याचं दिवशी त्यांची पोलीस दलातून निवृत्ती देखील झाली. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा, तसेच पोलीस दलातून ३७ वर्षे कर्तव्य बजावून निवृत्त झाल्याने त्यांच्या पुढील वाटचालीस देखील साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने लाख लाख शुभेच्छा.

बाजीराव घोलप हे शिवारे येथील कायमचे रहिवाशी. दुर्दम्य इच्छाशक्ती, आणि चिकाटी या गुणांवर त्यांनी मुंबई सारख्या महानगरात येवून, ट्रॅफिक पोलीस ते पोलीस उपनिरीक्षक या पदापर्यंत विविध पदावर इमाने इतबारे काम करून अगदी निष्कलंक पणे आज ते निवृत्त होत आहेत. या दरम्यान आपल्या नोकरीशी प्रामाणिक राहून त्यांनी आपली सेवा बजावली. आपले कर्तव्य बजावताना अनेक अधिकाऱ्यांनी त्यांच्या पाठीवर शाबासकी ची थाप दिली, तर ऊन, वारा, पाउस याची तमा न बाळगता केलेली सेवा हि निश्चितच निस्पृह होती.

हि सेवा बजावताना त्यांनी पाहुणे, मेहुणे हि नाती अतिशय जवळची असली, तरी नात्यांपेक्षा कर्तव्याला त्यांनी अधिक महत्व दिले, याचा आम्हाला अभिमान वाटतो. असे मत सोनवडे चे उत्तमराव वाघमारे यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले. संकटकाळी कर्तव्यभावनेने, आश्वासक शब्दांनी आणि सह्जगतेने त्यांनी केलेली नात्यांची गुंफण आम्हाला एकत्र रेशीमगाठी मध्ये बांधून ठेवण्यास उपयुक्त ठरली, असेही वाघमारे यांनी सांगितले.

या दरम्यान आपल्या आईला केलेला सॅल्युट निश्चितच मातृभक्ती ची जाणीव करून जातो. अशा या बाजीराव घोलप यांचे निवृत्त आयुष्य समाधानी, शांततेचे तसेच निरोगी लाभो. हीच प्रार्थना.