सामाजिक

” भिक नको, पण कुत्रं आवंर ” : ” म्हैस पन्नास हजाराची आणि नुकसान भरपाई एकवीसशे रुपये “


बांबवडे : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना शासनाने दिलेली नुकसान भरपाई म्हणजे , शेतकऱ्यांची केलेली क्रूर चेष्टा च आहे. अतिवृष्टीमुळे जनावरांच्या गोठ्याची भिंत अंगावर पडून एक म्हैस मरण पावली ,तर एक जखमी झाली. म्हैस ची किंमत ५००००/- रु., तर शासनाने दिलेली नुकसान भरपाई केवळ २१००/- आहे. या २१००/- रुपयात शेतकऱ्याने काय करावे, हा प्रश्नच आहे.


एकीकडे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले, तर दुसरीकडे भूस्खलन झाले. तर तिसरीकडे महापूर आला. यामध्ये शेतकऱ्याबरोबर व्यापारी वर्गाचे, व इतर जनतेचे देखील अतोनात नुकसान झाले. या नुकसानी मध्ये या अगोदर केवळ कोल्हापूर जिल्हा भरडून निघायचा. पण यावेळी पश्चिम महाराष्ट्रासोबत कोकणाचा देखील कणा मोडला आहे. अशावेळी शासनाकडून नुकसान भरपाई ची सगळ्यांचीच अपेक्षा होती. ती मिळाली देखील. पण चित्रं मात्र उलटे झालेले आढळले. ” भिक नको, पण कुत्रं आवंर ” असे म्हणायची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे.


शाहुवाडी तालुक्यातील खुटाळवाडी हे गाव कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर आहे. २१ जुलै २०२१ रोजी अतिवृष्टी झाली. दरम्यान येथील सर्जेराव बंडू खुटाळे यांच्या जनावरांच्या शेडची सुमारे १५ ते २० फुट उंच असलेली भिंत, या अतिवृष्टी मुळे कोसळली. त्यामुळे भिंतीच्या ढिगाऱ्याखाली या गोठ्यात असलेल्या दोन म्हैशी या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या. दरम्यान ग्रामस्थांनी ढिगारा उपसला. यामध्ये एका म्हैशीला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले, तर यामध्ये त्यांची एक म्हैस ढिगाऱ्याखाली गाडली गेल्यामुळे, मरण पावली.


या नुकसानीचा तलाठ्यांनी पंचनामा केला. पण त्यात त्यांनी कोणालाही म्हैशीची किमत विचारली नाही. आणि ते निघून गेले. त्यामुळे शासनाने देवळाला देणगी दिल्यासारखे २१००/- रु. नुकसान भरपाई दिली. दरम्यान यापेक्षा नुकसान भरपाई नसती दिली तरी चालले असते. दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी यावर पुनर्विचार करावा, आणि शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देवू नये. अशीच अपेक्षा शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!