गुन्हे विश्व

रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान ‘ आंबा ‘ जवळ सशस्त्र दरोडा


बांबवडे ( दशरथ खुटाळे ) : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर रत्नागिरी दिशेला जाताना आंबा गाव येण्याअगोदर मुख्य रस्त्यापासून नजीकच असलेल्या संतया शंकरया स्वामी (वय ६० वर्षे ) यांच्या राहत्या घरावर सशस्त्र दरोडा पडला. यामध्ये एकजण जखमी झाला असून, त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हि घटना काल दि. २३ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


सदर घटनेची नोंद शाहुवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस उपाधीक्षक रवींद्र साळोखे यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी कि, काल रात्री साडे आठ वाजनेच्या दरम्यान ८ ते १० जनांनी संतया स्वामी यांच्या घरावर सशस्त्र हल्ला केला. घरातील इतर मंडळींना बांधून ठेवून संतया स्वामी व त्यांचा मुलगा सिद्धरामय्या स्वामी यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. त्यांची पत्नी जगदेवी स्वामी ,तसेच सून श्रीदेवी स्वामी, आपेश्वर वय ९ वर्षे, धनेश्वर ७ वर्षे, मालेश्वर वय ५ वर्षे हि नातवंडे यांना घरात बांधून ठेवून शस्त्राचा धाक दाखवून चोरट्यांनी दोन लाख रुपये रोख, ७ तोळे सोन्याचे दागिने आणि बोलेरो गाडीसह पोबारा केला. या घटनेमध्ये संतया स्वामी किरकोळ जखमी झाले तर सिद्धरामय्या स्वामी यांच्यावर कोयत्याने वार केल्याने त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री फक्त साडेआठ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडल्याने आंबा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


सदर च्या घटनेच्या तपासासाठी श्वानपथक, ठसे तज्ञ यांना देखील पाचारण करण्यात आले. सदर घटनेचा अधिक तपास शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील करीत आहेत.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!