congratulationseducationalसामाजिक

शाहुवाडी च्या ” साळशी ” गडाला यशाचं तोरण : श्री आशिष पाटील यांची यशस्वी कामगिरी


बांबवडे : साळशी गावाच्या मातीने पुन्हा एकदा आपला रंग दाखवला. आणि या गावाच्या भूमीपुत्राने आपल्या बुद्धिमत्तेचा झेंडा अटकेपार लावला. सह्याद्रीच्या मातीचा सुगंध आसमंतात दरवळला, आणि आशिष अशोकराव पाटील या युवकाने युपीएससी परीक्षेत मानाचे स्थान पटकाविले. हा केवळ साळशी गावाच्या अभिमानाचा विषय नाही, तर संपूर्ण शाहुवाडी तालुक्याचे भूषण झाले आहे. श्री आशिष अशोकराव पाटील यांचे साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने मनापासून अभीनंदन ,आणि त्यांच्या पुढील वाटचालीस आभाळभर शुभेच्छा.


आशिष पाटील यांनी आपल्या यशाने आपल्या सोबत आपल्या आईवडिलांचे नाव सुवर्णाक्षराने लिहावे, अशी कामगिरी करून दाखवली. परंतु या यशामागे त्यांचे वडील अशोकराव पाटील यांचा फार मोठा हात आहे. आपल्या मुलांना शिकवण्याचे काम प्रत्येक आई – वडील करीत असतात. परंतु अशोकराव पाटील यांनी दुसऱ्या पालकांची मुले आपल्या मुलांप्रमाणे शिकवली. त्यांच्यासाठी पडेल ते कष्ट घेतले. नेर्ले, सावे या सारख्या छोट्या गावातील मुलांवर चांगले संस्कार करण्याबरोबर त्यांचा अभ्यास घेतला. त्यांना खेळात प्रवीण केले. आठवड्यातील एकमेव असणारी सुट्टी सुद्धा या व्यक्तीने आपल्या विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी कधी उपभोगली नाही. शिक्षकी पेशातील हे समर्पण निश्चितच अभिमानास्पद आहे.


आशिष पाटील यांचं प्राथमिक शिक्षण ग्रामीण भागातंच झालं. पहिली ते चौथी विरवाडी इथं झालं. चौथी ला त्यांना स्कॉलरशिप मिळाली. पाचवी ते सातवी पर्यंत शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल सुपात्रे इथं झालं. इथं सुद्धा त्यांनी सातवी ला स्कॉलरशिप पटकावली. हे सांगण्यामागचा मतितार्थ एवढाच कि, यश हे शाळेवर अवलंबून नसतं, तर तुम्ही त्यासाठी किती कष्ट घेता, यावर अवलंबून असतं. आशिष यांचे वडील प्राथमिक शिक्षक आहेत.

जशी बदली, तशी शाळा. या गोष्टी पर्यायाने येतातच. परंतु तुम्ही जर जिंकण्याचा निर्धार केला, तर तुम्हाला कुणी हरवू शकत नाही. हे लक्षात ठेवा. आठवी ते दहावी पर्यंत शिक्षण बांबवडे येथील महात्मा गांधी विद्यालयात झाले. अकरावी, बारावी कॉलेज पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज मध्ये झाले. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथून ते २०१९ ला बीटेक झाले. तिथून पुढे सहा महिने दिल्ली इथं क्लासेस केले. तर लॉक डाऊन च्या काळात घरात बसून त्यांनी अभ्यास केला. पहिला प्रयत्न २०२० ला केला त्यात असफल झाले. पण सह्याद्रीची माती खूप चिवट आहे.त्यांनी पुन्हा एकदा जोराचा प्रयत्न केला , आणि २०२१ ला त्यांच्या ओंजळीत यशाची भगीरथाची गंगा उगम पावली. ५६३ व्या क्रमांकाने त्यांनी गड जिंकला, आणि शाहुवाडी च्या साळशी गडाला यशाचं तोरण त्यांनी बांधलं.


अभ्यासातील सातत्य, स्वत:च्या नोट्स काढणे, वर्तमानपत्र वाचणे, हे त्यांच्या यशाचं गमक आहे. आई – वडिलांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन, तसेच मित्र मंडळींच्या सदिच्छा आणि सहकार्य हे देखील मोलाचं होतं. ते त्यांना लाभलं. वडिलांनी दुसऱ्यांच्या मुलांसाठी घेतलेले कष्ट , आणि त्यांची पुण्याई आज यशाच्या रूपाने हळुवारपणे आशिष यांच्या ओंजळीत एकवटली.


या यशस्वी युवकाकडून अनेक विद्यार्थ्यांनी शिकावे, अभ्यासात सातत्य ठेवावे, यश तुमच्या हातून जाणार नाही, याची खुणगाठ बांधा. पुनश्च आशिष अशोकराव पाटील यांचे मनस्वी अभिनंदन आणि पुढील वाटचालीस आभाळभर शुभेच्छा..

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!