सभापती आणि पोलीस अधिकाऱ्यांची समाजाप्रती भूमिका प्रशंसनीय
शाहुवाडी प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यात पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यासाठी बोट खांद्यावर घेवून, तिथपर्यंत पोहचण्यासाठी सभापती विजय खोत, सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांना चांगलीच कसरत करावी लागली. कांडवण येथील पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्याबरोबरच कोरोना साठी आवश्यक असणाऱ्या औषधांची खबरदारी घेत औषधे, हि सुरक्षित राखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. त्यांच्या या कर्तुत्वाने खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी आणि लोकसेवक हि भूमिका या दोघांच्या अनुषंगाने समाजासमोर आली आहे.

शाहुवाडी तालुक्यात दोन दिवसापूर्वी पुराने चांगलेच थैमान घातले होते. सर्वच परिसराला पाण्याचा वेढा पडला होता.अशीच भयंकर परिस्थिती कांडवण परिसरात झाली होती. एकतर भूस्खलन झाल्याने डोंगराचा खचलेला भाग, आणि त्यातच काही कुटुंबे पुराच्या पाण्यात अडकली होती. जाण्यासाठी मार्ग नाही, आणि त्यामुळे बोट खांद्यावर घेवून जाण्याशिवाय पर्याय नव्हता.अशावेळी सभापती असलेले विसरून जावून, त्यांनी व स.पोलीस निरीक्षक देशमुख यांनी सहकाऱ्यांसोबत बोट खांद्यावर घेवून भर पावसात, वाट तुडवत पूरग्रस्तांपर्यंत बोट पोहचवली ,आणि त्यांना धीर दिला.

त्याचबरोबर कोरोना च्या महामारीने सर्वांनाच पछाडले आहे, या भीषण संकटात सुद्धा कोरोना लस व महत्वाच्या औषधांची खबरदारी घेवून, शित्तूर तर्फ वारुण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहचवून रुग्णांना आधार दिला.

एकूणच पुराच्या भीषण संकटात नागरिकांना आधार देण्यासाठी पदाधिकाऱ्यांसह अधिकारी देखील आघाडी वर होते.